कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर बळजबरी नको
पालकमंत्र्यांची बँका-वित्तसंस्थांना सूचना, खासगी सावकारांनाही इशारा
बेळगाव : संपूर्ण राज्यात दुष्काळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या कर्जवसुलीसाठी बळजबरी करू नये, अशी सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बँका व पतसंस्थांना केली आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बँका व प्रमुख सहकारी पतसंस्थांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी वरील सूचना केली आहे. बेळगावसह संपूर्ण राज्यात दुष्काळ आहे. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीसाठी बळजबरी करू नये. याबरोबरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारी वृद्धापवेतन किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेची रक्कम कर्जाच्या हप्त्यासाठी मोडून घेऊ नये, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना शून्य व्याजाने कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी पावले उचलावीत. क्शेतकऱ्यांवर कर्जवसुलीसाठी दमदाटी करू नये, असे जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, दुष्काळामुळे पुढील तीन महिने तरी कर्जवसुलीसाठी जाऊ नये, शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून त्यांना त्रास देऊ नये, केवळ बँका आणि सहकारी संस्थाच नव्हे तर खासगी सावकारांकडूनही शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी आमदार राजू सेठ, सहकार खात्याचे सहनिबंधक सुरेश गौडा, उपनिबंधक मणी एम. एन., जिल्हा लिड बँकेचे व्यवस्थापक प्रशांत कुलकर्णी यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.