मुळगाव येथील जाहिर सभेत एकमुखी सुर. गाव उध्वस्त होऊ देणार नाही. संघटीतपणे लढा देण्याचे आवाहन. गावाला खाण लीजमधून वगळावे
डिचोली : एकेकाळी नैसर्गिक वैभव लाभलेल्या मुळगाव या गावाचे संपूर्ण वैभव खाण व्यवसायाने नष्ट केले आहे. या गावाचे डोंगर, तलाव, जलस्रोत नष्ट केल्यानंतर आज संपूर्ण गावच खाण व्यवसायाच्या नावाखाली उध्वस्त करण्याचे षडयंत्र चालू आहे. गावाचे अस्तित्व धोक्मयात घालून व गाव उध्वस्त करून आम्हाला मुळगावात खाण व्यवसाय नको, असा एकमुखी सुर मुळगाव येथे झालेल्या खाण विरोधी जाहिर सभेत सर्वच वक्त्या?नी आवळला. खाणींपासून मुळगाव गावाचे अस्तित्व राखण्यासाठी मुळगाव पंचायतीतर्फे काल रवि. दि. 10 डिसें. रोजी गावकरवाडा मुळगाव येथे श्री देवी केळबाईच्या मंदिरात जाहिर सभा घेण्यात आली. या सभेला मुळगाववासीयांनी खाणींच्या विरोधात आपल्या एकजुटीचे दर्शन घडविले. या सभेत विचार व्यक्त केलेल्या प्रत्येक वक्त्याने खाणी विरोधात आपली भुमिका मांडताना गावच्या अस्तित्वाचा सौदा करून खाणी नकोत. खाण लीजातून संपूर्ण गाव व गावातील नैसर्गिक स्तोत्र बाहेर काढा आणि नंतरच पुढील कार्यवाही करा. अशीच भुमिका मांडली. या सभेला मुळगाव गावातील तमाम नागरिक, गावच्या हितचिंतक महिला, पर्यावरण प्रेमी, सरपंच तृप्ती गाड, उपसरपंच गजानन मांद्रेकर, विशालसेन गाड, इतर पंचसदस्य, कोमुनिदाद, देवस्थान समिती, शेतकरी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. सरपंचा तृप्ती गाड यानी कोणत्याही परिस्थितीत गावाचे अस्तित्व टिकवणे हे आमचे कर्तव्य असून पंचायत पूर्ण ताकदीने गावावरोबर राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. सभेत मार्गदर्शन करताना देवस्थान अध्यक्ष वसंत गाड यांनी, ही अस्तित्वाची लढाई असून या गावात देवतांचे वास्तव्य आहे. हे गाव पूर्वापार पासून वसलेले असून या गावाला उध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे. गावातील लोकांनी एकोपा राखून प्रखर विरोध करावा, असे आवाहन वसंत गाड यांनी केले.
पूर्वाजांनी जे राखून ठेवले ते पुढच्या पिढीसाठी राखून ठेवण्यासाठी व गावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी एकसंघ राहावे असे आवाहन केले. लिजमध्ये 230 घरे 14 मंदिरे, 3 मुख्य तलाव, सोळा हजार चौरस मीटर जागा, स्मशानभूमी, दोन शाळा खाण लीजमध्ये येतात. एकूण 164 हेक्टर जमीन लिजमध्ये आहेत असेही वसंत गाड यांनी स्पष्ट केले. मुळगाव नागरिक समितीचे प्रकाश परब यांनी कोणत्याही परिस्थितीत खाणवाल्यांना बळी पडणार नाही, अशी शपथ प्रत्येकाने घ्यातला हवी. आज गावचे व गावाबरोबरच आमच्या अस्तित्वासाठी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाने तयार रहावे, असे स्पष्ट केले. संजय वझरकर यांनी सरकार आपला नफा बघते. सरकार वेळोवेळी बदलणे गरजेचे असून तसे न केल्यास त्रास होणार आहे, त्यामुळे एकत्र राहून ही लढाई पुढे नेणे गरजेचे आहे. स्वत:चे घर असताना घराला नंबर न देता खाण कंपनीकडे चला असे सागितले आहे. अशी परिस्थिती असेल तर मुळगाववासीयांचं कसं होणार असा सवाल उपस्थित केला. आमचा गाव व या गावाचे वैभव ही पूर्वजांची मालमत्ता असून त्यावर संक्रांत आणण्याची भीती आहे. पंचायतीने खाण व्यवसायाबाबत माहिती घेवून बफर झोनमध्ये हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध घालावा. कोणत्याही परिस्थितीत निवासी जागेत खाण व्यवसायाला परवानगी देऊ नये. तसेच पंचायतीने कडक भुमिका घेताना कंपनीच्या मागणीकडे लक्ष न देता, कोणत्याही परिस्थितीत कोणतीही परवानगी अथवा ना हरकत देऊ नये. अशी मागणी प्रशांती मांद्रेकर यांनी केली. प्रकाश आरोंदेकर यांनी, गेली पन्नास वर्षे खाण व्यवसाय सुरू ठेवला. गावाला कसलाच लाभ झाला नाही. उलट गावातील शेती बागायती नष्ट झाली. आता राहिलेले गावाचे अस्तित्व नष्ट होण्यापासून गावाचा वाचविणे हि आमची जबाबदारी आहे, असे म्हटले. हरी परब, सूर्यकांत परब, केशव परब, पुतुलो गाड, विनोद मांद्रेकर यांनी खाण गावाला भूषण नाही गावाला उध्वस्त केले. कामगारांनाही खाली केले आता कुणालाच या खणींचा फायदा होणार नाही. जोपर्यंत लीजमधून गाव मंदिरे काढली जात नाही तोपर्यंत कसलीच परवानगी देण्यात येऊ नये, असे सांगितले.