कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा
सांबरा येथील ग्राम पंचायतीला सीईओंनी दिली भेट
बेळगाव : सांबरा ग्राम पंचायतीच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचरा टाकला जातो. त्यामुळे वारंवार समस्या निर्माण होत आहेत. तेव्हा तातडीने त्या कचऱ्याची उचल करून त्याची विल्हेवाट लावावी, अशी सक्त ताकीद जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली आहे. सांबरा ग्राम पंचायतीला भेट देवून त्यांनी या परिसराची पाहणी केली. सांबरा येथे विमानतळ असल्यामुळे प्रवाशांची संख्या अधिक असते. याचबरोबर बागलकोटला जाणारा हा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे वाहनांचीही वर्दळ असते. तेव्हा हा परिसर स्वच्छ करण्यासाठी प्राधान्य द्या, असे त्यांनी सांगितले. कचरा टाकताना कोणीही आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी. जेणे करून यापुढे कोणीही या परिसरात कचरा टाकणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कचरा उचलसाठी कर लावा
सांबरा रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानांमध्ये थेट कचरा उचलावा. याचबरोबर या कचऱ्याची उचल करण्यासाठी त्यांच्याकडून कर देखील जमा करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर वसुलीवर देखील भर देणे गरजेचे असून ग्राम पंचायतींना अधिकाधिक जास्त कर कसा जमा होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी रामरे•ाr पाटील, साहाय्यक संचालक बसवंत कडेमनी, ग्राम पंचायत विकास अधिकारी सिद्धलिंग सरुर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.