उत्तर कर्नाटकच्या विकासावर आजपासून चर्चा
पहिल्या दिवशी दिवंगतांना आदरांजली : काही विधेयकेही मांडणार : विरोधी पक्षांचीही जोरदार तयारी
बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी विद्यमान आमदार एच. वाय. मेटी, वृक्षमाता सालुमरद तिम्माक्का, प्रसिद्ध कादंबरीकार एस. एल. भैरप्पा आदींना श्रद्धांजली वाहून विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. मंगळवारपासून उत्तर कर्नाटकच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चेला सुरुवात होणार आहे. कामकाज तहकूब झाल्यानंतर कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. मंगळवारपासूनच उत्तर कर्नाटकच्या समस्यांवर चर्चेला सुरुवात करण्याचे ठरविण्यात आले आहे. मंगळवारी सरकारकडून काही विधेयके मांडण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. उत्तर कर्नाटकच्या मुद्द्यावर चर्चेसाठी जास्तीत जास्त वेळ द्या, अशी मागणी केली जात होती. आता पहिल्याच आठवड्यात यावर चर्चा होणार आहे. सत्तासंघर्षात गुंतलेल्या काँग्रेस नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी भाजपने तयारी केली आहे.
विरोधी पक्षाला तितक्याच ताकदीने सामोरे जाण्याची तयारी सरकारने केली आहे. मात्र, दोन्ही पक्षातील अंतर्गत लाथाळ्यांची ठळक चर्चा होत आहे. काँग्रेस हायकमांडने अधिवेशनात एकी दाखविण्याचा सल्ला आपल्या पक्षाच्या नेत्यांना दिला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आम्ही दोघे एक आहोत, असे सांगत असले तरी त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र एकी नसल्याचे दिसून येते. भाजपमध्येही अस्वस्थता आहे. प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्याविरोधात माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखालील एक मोठा गट कार्यरत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे दिसून येते. मंगळवारी 9 डिसेंबर रोजी काँग्रेस संसदीय पक्ष बैठक होणार आहे. कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या चर्चेला पूर्णविराम देण्याची सूचना हायकमांडने केली असली तरी ती अद्याप पूर्णपणे थांबली नाही. मंगळवारी होणाऱ्या संसदीय पक्ष बैठकीत संघर्ष थांबला आहे की अद्याप सुरू आहे, हे दिसून येणार आहे.
सिद्धरामय्या हेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार...
नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर कोणीही उघडपणे वक्तव्य करू नये, असा हायकमांडने दंडक घातल्यानंतरही पाच वर्षे सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री असणार, असे त्यांचे चिरंजीव यतिंद्र सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे. त्यामुळे डी. के. शिवकुमार समर्थकांनीही त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळूरमध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगावातही शिफ्ट झाला आहे. नेतृत्वबदल करण्याची परिस्थिती कर्नाटकात नाही, असे हायकमांडने स्पष्ट केले आहे. काँग्रेसमध्ये खुर्चीसाठी संघर्ष नाही. विरोधकांनी उठवलेल्या या अफवा आहेत. सिद्धरामय्या हेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार, असे यतिंद्र यांनी सांगितले आहे.
बुधवारचा दिवस उत्तर कर्नाटकच्या चर्चेसाठी राखीव
157 व्या अधिवेशनदरम्यानचा बुधवारचा दिवस उत्तर कर्नाटक व कल्याण कर्नाटकच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. अप्पर कृष्णा योजना, म्हादई, कळसा भांडुरा, वनजमिनीवरील अतिक्रमण, उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, रोजगार निर्मितीसाठी क़ृती योजना, तसेच पीडितांची समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी दिली.