काँग्रेसकडून कर्नाटकातील लोकांची निराशा
भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डाचा दावा : गॅरंटी लागू न केल्याचा आरोप
काँग्रेसने स्वत:च्या निवडणूक गॅरंटींना कर्नाटकात लागू न केल्याचा आरोप भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केला आहे. तेलंगणात देखील सत्तारुढ बीआरएस आणि काँग्रेस जनतेला खोटी आश्वासने देत आहे. कर्नाटकातील लोक काँग्रेस सरकारकडून आश्वासनांची पूर्तता होण्याची प्रतीक्षा करत आहेत. यात बेरोजगारांना भत्ता देण्याची गॅरंटी सामील असल्याचे नड्डा यांनी संगारेड्डा येथील जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले आहे. तेलंगणात काँग्रेस आणि केसीआर यांच्या गॅरंटी केवळ भूलथापा आहेत. अन्यथा काँग्रेस अणि केसीआर हे सत्तेवर आल्यास केवळ भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचीच गॅरंटी देऊ शकतात असे नड्डा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक शक्ती होण्याच्या मार्गावर आहे. तेलंगणातील जनतेने भाजपला सत्तेचा कौल दिल्यास तेलंगणा देखील या प्रगतीचा हिस्सा ठरू शकतो. आगामी 25 वर्षांमध्ये भारत विकसित देश असेल असा आम्हाला विश्वास असल्याचे उद्गार केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी काढले आहेत.
मोदींनी देशवासीयांमध्ये उज्ज्वल भविष्याचा आत्मविश्वास निर्माण केला आहे. भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला आहे. आगामी तीन वर्षांमध्ये आम्ही तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरणार आहोत. प्रामाणिक सरकारच्या कार्यकाळात लोकांना नव्या संधी मिळू शकतात असे गोयल यांनी म्हटले आहे.