भक्त आणि देव एकमेकांचा पाठपुरावा करत असतात
अध्याय नववा
बाप्पा म्हणाले, माझ्यावर भक्ती आणि प्रेम करणारा अडाणी असला तरी प्रत्यक्षात तो विद्वानांपेक्षा श्रेष्ठ ठरतो. ह्या अर्थाचा भक्तिश्चैवादरश्चात्र कारणं परमं मतम् । सर्वेषां विदुषां श्रेष्ठो ह्यकिंचिज्ञोऽपि भक्तिमान् ।।7 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. जसजशी भक्ताची आध्यात्मिक प्रगती होत जाते तसतशी भगवद् नामातील गोडी त्याला उमगू लागते व मग आपोआपच त्याचे मन देवावर केंद्रीत होते. नाम घेत असताना तो ईश्वराशी जोडला जातो. त्याची भक्ती आणि ईश्वराविषयी आदर हे दोन मुद्दे एव्हढे महत्त्वाचे ठरतात की, त्याच्यापुढे विद्वानांची विद्वत्ता कवडीमोल ठरते. भक्ती करण्याचे नऊ प्रकार आहेत. त्यापैकी कोणत्याही प्रकारे केलेली भक्ती देवाला प्रिय असते. इश्वरमय होण्याची प्रत्येक संधी तो नवविधा भक्तीतून साधत असतो. ज्याने आपले जीवन विष्णुला अर्पण केले आहे त्याला सर्वोत्तम मानण्यात यावे कारण त्याने सर्व ज्ञान मिळवलेले असते. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन हे भक्तीचे चार प्रकार आपण बघितले. आता पुढील प्रकार पाहू.
जमेल तशी तो त्यांची षोडशोपचारे पूजा करून अर्चनभक्ती साधतो. जर षोडशोपचारे पूजा जमली नाही तर समर्थ दासबोधात सांगतात त्याप्रमाणे मानसपूजा तरी करतोच. समर्थ म्हणतात, ऐसी पूजा न घडे बरवी। तरी मानसपूजा करावी। मानसपूजा अगत्य व्हावी। परमेश्वरासी ।। 4/5/31 दासबोध.
तो सतत देवाला वंदन करत असतो. ईश्वराची सेवा करायचा प्रयत्न करतो. प्रत्यक्ष सेवा शक्य नसेल तर त्यांच्या भक्तांची सेवा करतो. त्यांचा सखा होऊन त्यांच्याशी हितगुज करतो. मनातली प्रत्येक गोष्ट त्यांना सांगतो आणि शेवटी सर्वस्वी त्यांना शरण जाऊन आत्मनिवेदन करतो की, ईश्वरा तू जे जे देशील ते मला मान्य आहे आणि जे देणार नाहीस ते ते माझ्यासाठी योग्य नाही याची मला खात्री आहे. तू माझ्या आयुष्यात जे जे घडवशील ते माझ्या हिताचंच असणार आहे. माउली म्हणतात, आत्मनिवेदन करणारा भक्त कसा असतो तर ज्याप्रमाणे बागेचा माळी पाण्याचा पाट जसजसा वळवतो त्याप्रमाणे पाणी बिनतक्रार वहात जाते, त्याप्रमाणे भक्त ईश्वराच्या इच्छेनुसार, विनातक्रार जीवन व्यतीत करतो. माळियें जेउतें नेलें । तेउतें निवांतचि गेले। तया पाणिया ऐसे केलें । होआवें गा ज्ञानेश्वरी 12.120
भक्त ईश्वराशी एव्हढा तल्लीन झाल्यावर ईश्वर त्याच्या मागे मागे फिरत असतात, त्याचे सर्व बाजूनी रक्षण करतात. ईश्वर स्वत: अजिंक्य असले तरी भक्ताच्या प्रेमापुढे ते लिन होतात. ईश्वराची भक्ती करणारा कोणत्याही समाजातला असला तरी देव कधी भेदभाव करत नाहीत. भक्त करत असलेल्या कामात ते आपणहून मदत करतात हे तुकाराम महाराजानी स्वत: प्रचीती घेऊन रचलेल्या अभंगातून लक्षात येते. तो अभंग असा, उंचनिंच कांही नेणे भगवंत। तिष्ठे भावभक्ति देखोनियां।। दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी। दैत्याघरी रक्षीं प्रल्हादासी।। चर्म रंगू लागे रोहिदासासंगे। कबिराचे मागीं विणी शेले।। सजनकसाया विकू लागे मांस। माळ्या सांवत्यास खुरपूं लागे।। नरहरिसोनारा घडों फुंकूं लागे। चोखामेळ्यासंगे ढोरें ओढी।। नामयाची जनी सवें वेची शेणी। धर्माघरीं पाणी वाहे झाडी।। नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित। ज्ञानियाची भिंत अंगी ओढी।। अर्जुनाचे रथी होय हा सारथी। भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची।। गौळीयांचे घरी गाई अंगे वळी। द्वारपाळ बळीद्वारीं झाला।। यंकोबाचे ऋण फेडी हृषीकेशी। आंबरिशाचे सोशी गर्भवास।। मिराबाई साठी घेतो विष प्याला। दामाजीचा जाला पाडेवार।। घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची। हुंडी त्या मेहत्याची अंगें भरी।। पुंडलिकासाटीं अझूनि तिष्ठत। तुका म्हणे मात धन्य याची।।
क्रमश: