Operation Sindoor : कुणी हल्ला केल्यास योग्य बदला घेतला जाईल, CM फडणवीसांनी केलं कौतुक
कुणी हल्ला केल्यास भारत त्याचा योग्य पद्धतीने बदला घेईल, तो आपण आज घेतला
Operation Sindoor Devendra fadnavis : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी रात्री भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानच्या दहशतवादी स्थळांवर हल्ला केला आहे. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जगभरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय सैन्य दलाचं आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं सर्व मिळून मनःपूर्वक अभिनंदन करूया, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
ऑपरेशन सिंदूर मार्फत करण्यात आलेल्या हल्याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, देशाच्या सैन्य दलाकडून अतिशय बिसीजन पद्धतीने एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे उध्वस्त करण्यात आले आहेत. यावेळी ते उध्वस्त करताना संपूर्ण शूटिंग उपलब्ध असल्यामुळे कोणाला पुरावा मागण्याकरता स्कोप राहिलेला नाही. सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा हा दिवस आहे. आमच्यावर झालेला हल्ला भारत सहन करणार नाही हे या हल्ल्यातून दाखवून दिले आहे.
कुणी हल्ला केल्यास भारत त्याचा योग्य पद्धतीने बदला घेईल. तो आपण आज घेतला आहे. विशेषत: 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव अधिक बोलकं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचे आणि भारताच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करुया, असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, सध्या राज्याच्या विविध क्षेत्रातून या हल्ल्याचे कौतुक होत आहे. असा हल्ला होणे गरजेचे होते त्याशिवाय पाकिस्तानसा अद्दल घडणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया समाज माध्यमांवर फिरत आहेत. सांगली, कोल्हापूरसारख्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि पेढे-साखर वाटत हल्ल्याचा आनंद साजरा केला जात आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, आमदार सतेज पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांच्यासह एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी या नेत्यांनीही समाज माध्यमांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.