हुबळी-पंढरपूर पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी
खानापूर, हल्याळ परिसरातील वारकरी सांप्रदायातून मागणी
खानापूर : हुबळी-पंढरपूर मार्गावर नियमित पॅसेंजर रेल्वे सुरू करावी, अशी मागणी खानापूर, हल्याळ परिसरातील वारकरी सांप्रदायातून होत आहे. दि. 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. तालुक्यात वारकरी सांप्रदाय मोठ्या प्रमाणात असल्याने हुबळी-पंढरपूर रेल्वे सुरू केल्यास तसेच प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहेत. यासाठी रेल्वे प्रशासनाने हुबळी-पंढरपूर रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. खानापूर-हल्याळ परिसरात वारकरी सांप्रदाय मोठ्या प्रमाणात असल्याने वारकरी वेळोवेळी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. तसेच आषाढी, कार्तिकी, माघवारीसाठी वारकरी सांप्रदाय मोठ्या प्रमाणात पंढरपूरला जात असतो. दर एकादशीलाही अनेक वारकरी पंढरपूरला जात असतात. कोरोना काळात आणि रेल्वे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे बंद केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने हुबळी-पंढरपूर अशी थेट रेल्वे सुरू केल्यास वारकरी सांप्रदायासह प्रवाशांची सोय होणार आहे.
सध्या मिरजपर्यंत पॅसेंजर रेल्वे आहे. तेथून पंढरपूरला दुसऱ्या रेल्वेने जावे लागते. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. यासाठी हुबळी-पंढरपूर ही रेल्वे सुरू केल्यास गैरसोय दूर होणार आहे. तालुक्यातील गावागावांमधून पंढरपूरला जाण्यासाठी ट्रक, टेम्पो, क्रूझर तसेच इतर वाहनांची व्यवस्था करण्यात येते. रेल्वे प्रशासनाने खास वारकऱ्यांसाठी हुबळी-पंढरपूर मार्गावर खास रेल्वे सुरू केली होती. मात्र कोरोना काळात ही रेल्वे बंद केल्याने वारकरी सांप्रदायाची तसेच प्रवाशांची गैरसोय होत आहे. खानापूर स्थानकावर जलद रेल्वे थांबवाव्यात, अशी मागणी अनेक वर्षापासून होत आहे. मात्र ठरावीक रेल्वे सोडल्या तर इतर रेल्वे खानापूर स्थानकावर थांबत नाहीत. खानापूर तालुक्यातून सैन्य दलात तसेच व्यवसाय-नोकरीनिमित्त परराज्यात जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने खानापूर स्थानकावर दिल्ली तसेच अन्य ठिकाणी जाणाऱ्या रेल्वे थांबवाव्यात, अशी मागणी होत आहे.