रामतीर्थनगर परिसरातील समस्या तातडीने सोडवण्याची मागणी
रहिवाशांचे बुडा अध्यक्षांना निवेदन
बेळगाव : बुडाने 35, 43, 43 ए या वसाहती योजना राबविल्या. मात्र, या वसाहतींमध्ये कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध केल्या नाहीत. 2000-2004 या कालावधीमध्ये रामतीर्थनगर परिसरात या योजना राबविल्यानंतर बुडाने गटारी, पथदीप, पिण्याच्या पाण्याची सोय आणि रस्ते करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आजपर्यंत विविध समस्यांना येथील रहिवासी तोंड देत आहेत. तेव्हा तातडीने या सर्व समस्या सोडवाव्यात, अशी मागणी रामतीर्थनगर येथील रहिवाशांनी बुडा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बुडाने योजना राबविल्यानंतर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करणे महत्त्वाचे आहे. मात्र, अजूनही या वसाहती महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्या नाहीत. कोणत्याही समस्या आल्यानंतर महानगरपालिकेकडे निवेदन किंवा आपले गाऱ्हाणे मांडल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी बुडाकडे बोट दाखवत आहेत. बुडाला निवेदन दिल्यानंतर केवळ आश्वासने देऊन मनपाने या सर्व समस्या सोडविल्या पाहिजेत, मात्र, एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. वास्तविक बुडानेच या समस्या सोडविल्या पाहिजेत. तेव्हा तातडीने या समस्या सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
बुडाकडून समस्या दूर करण्याची मागणी
या वसाहतींमध्ये खुल्या जागा आहेत. या ठिकाणी झाडे-झुडपे वाढली आहेत. गटारी बुजल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे अवघड झाले आहे. पाणीपुरवठा देखील योग्यप्रकारे केला जात नाही. त्यामुळे पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. तेव्हा बुडाने या सर्व परिसरामध्ये निर्माण झालेल्या समस्या दूर कराव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे. बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांना निवदेन देण्यात आले. यावेळी नगरसेवक अॅड. हणमंत कोंगाली, माजी महापौर निर्वाणी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.