मळगाव ग्रामपंचायतची कार्यकारिणी बरखास्त करा
ग्रामसेवक निलंबनाची कारवाईही मागे घ्या ; अन्यथा आंदोलन करू ; मळगाव ग्रामस्थांची मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी
मळगाव ग्रामपंचायतची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करा तसेच ग्रामसेविका शोभा सावंत यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्या अशी मागणी मळगाव ग्रामस्थ पांडुरंग राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे केली. ग्रामपंचायत कार्यकारिणी बरखास्त न झाल्यास प्रसंगी आंदोलनाची भूमिकाही घेऊ असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
श्री राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत माजी सरपंच गजानन सातार्डेकर, गणेश प्रसाद पेडणेकर ,गुरुनाथ गावकर, महेश शिरोडकर ,पांडुरंग नाटेकर ,निखिल राऊळ, सहदेव राऊळ , आदी ग्रामस्थ उपस्थित होते. श्री राऊळ म्हणाले पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च न केल्याप्रकरणीचा ठपका ठेवून ग्रामसेविका शोभा राऊळ यांचे केलेले निलंबन चुकीचे असून ग्रामस्थ म्हणून आमचा पूर्ण पाठिंबा आहे. सहा महिन्यापूर्वी त्या ग्रामसेविका म्हणून मळगाव ग्रामपंचायतीत रुजु झाल्या होत्या. त्यामुळे 15 व्या वित्त आयोगाचा निधी एवढ्या कमी वेळात त्या कशा काय खर्च करू शकतात. एकीकडे नियमित ग्रामसेवक नसल्यामुळे आधीच पंधराव्या वित्त आयोगाची कामे रेंगाळलेली होती तर दुसरीकडे निधी खर्च घालण्यासाठी आवश्यक असलेल्या ठरावाला ग्रामपंचायत बॉडीचं सहकार्य नसल्यामुळे निधी खर्च पडू शकला नाही. त्यामुळे याला ग्रामसेविकेला जबाबदार धरून त्याचे निलंबन करणे चुकीचे असून याला ग्रामपंचायत कार्यकारिणी तितकीच जबाबदार आहे. त्यामुळे ग्रामसेविकेची झालेली निलंबनाची कारवाई मागे घेण्याची मागणी आम्ही केली आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नायर यांनीही सकारात्मकता दाखवली आहे.
ते पुढे म्हणाले ग्रामपंचाय कारभारामध्ये मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात अपहार आहे. यासंदर्भात सर्व माहिती आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. एकीकडे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतानाही आवश्यक असलेली ग्रामसेविकेची सही नसताना कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यामध्ये आर्थिक साठेलोटे आहेत. तर कर्मचाऱ्यांना पगार देताना ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचाही विचार केलेला नाही कर्मचाऱ्यांना अवाच्यासव्वा पगार वाढ देण्यात आली. एकूणच या सगळ्या गोष्टी मागे पूर्ण ग्रामपंचायतची कार्यकारिणी कारणीभूत असल्याने ती बरखास्त करण्यात यावी अशी मागणी ही करण्यात आली आहे. आमची मागणी वेळीच मान्य न झाल्यास प्रसंगी यासाठी आम्ही आंदोलनात्मक पवित्राही हाती घेणार आहोत.