खानापूर तालुक्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफी देण्याची मागणी
ब्लॉक काँग्रेसच्यावतीने टोल व्यवस्थापकांना निवेदन
खानापूर : तालुक्यासह इतर ठिकाणाहून आषाढ एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना गणेबैल येथील टोलनाक्यावर सूट द्यावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर ब्लॉक कॉंग्रेसतर्फे गणेबैल टोलनाक्यावरील व्यवस्थापकांना दिले. यावेळी टोल व्यवस्थापकांनी निवेदनाचा स्वीकार करून आपण याचा सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले. तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातून पंढरपूर यांत्रेसाठी वारकरी मोठ्या प्रमाणात दिंडीसह वाहनातून जातात. त्यांच्या वाहनाना जाताना व परत येताना टोल माफी देण्यात यावी, अशी मागणी ब्लॉक काँग्रेसच्यावतीने ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने टोलनाक्याचे व्यवस्थापक मंजुनाथ बागेवाडी यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
यावेळी व्यवस्थापक मंजुनाथ बागेवाडी यांनी वरिष्ठांशी चर्चा करून वारकऱ्यांनीं आपली वाहने नेण्यास हरकत नसल्याचे सांगितले. यासाठी खानापूरहून जाताना दोन नंबरच्या लेनमधून गाड्या घेऊन जायच्या आहेत. परत येताना 9 नंबरच्या लेनमधून या गाड्या घेऊन यायच्या आहेत. गाड्यांवर भगव्या पताका लावायच्या आहेत, असे टोलचे व्यवस्थापक मंजुनाथ बागेवाडी यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते अॅड. ईश्वर घाडी, महांतेश राऊत, प्रसाद पाटील, जोतिबा गुरव, दिपक कवठणकर, तोहीद चांदकन्नावर, सूर्यकांत कुलकर्णी, बबन सोज, ईश्वर बोबाटे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.