शहरातील निकृष्ट उड्डाणपुलाबाबत चौकशीची मागणी
राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहरातील रेल्वे उड्डाणपुलांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने अल्पावधीतच उड्डाणपुलाचे नुकसान झाले. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी नैर्त्रुत्य रेल्वेकडे केली जाणार असल्याची माहिती राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी दिली.
शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकरी, हिवाळी अधिवेशन यासह इतर प्रश्नांबाबत राज्य सरकारवर सडकून टीका केली. बेळगाव जिल्ह्याचा विकास सध्याच्या सरकारमध्ये पूर्णपणे खुंटला आहे. जिल्ह्यात 120 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊन देखील अद्याप त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. जिल्हा विस्ताराने मोठा असला तरी राज्य सरकारकडून कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने जिल्ह्याची प्रगती झालेली नाही. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
विकासाच्या बाबतीत राज्य सरकार अपयशी
मोठा गाजावाजा करत सत्तेत आलेले काँग्रेस सरकार विकासाच्या बाबतीत अपयशी ठरले आहे. मुडासह वाल्मिकी महामंडळात झालेल्या भ्रष्टाचारात मुख्यमंत्री व राज्य सरकारची प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळे बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन घेण्याचे प्रयोजनच काय? असा प्रश्न कडाडी यांनी उपस्थित केला.
यावेळी अॅड. एम. बी. जिरली, माजी आमदार संजय पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.