दिव्यांग पेन्शन वाढविण्याची मागणी
संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : राज्यामध्ये दिव्यांगांची संख्या मोठी आहे. दिव्यांगांना मानाने जगण्यासाठी सरकारने दिव्यांग पेन्शन वाढ करावी. सरकारी नोकरीमध्ये राखीवता ठेवण्यात यावी, अंत्योदय कार्ड वितरीत करण्यात यावेत, अशा विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिव्यांग कल्याण संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. वाढत्या महागाईमुळे दिव्यांगांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी सरकारकडून सध्या दिल्या जाणाऱ्या दिव्यांग पेन्शन वितरणात वाढ करावी, 5 हजारापर्यंत पेन्शन देण्यात यावी. सर्व दिव्यांगांना अंत्योदय रेशनकार्ड वितरीत करण्यात यावीत. सरकारच्या वसती योजनांमध्ये दिव्यांगांना आद्यक्रम देण्यात यावा. सध्या बसपास देण्यात आले असून, त्याची कार्यव्याप्ती वाढविण्यात यावी. राज्यभरात प्रवास करण्याची सोय करून द्यावी. रोजगारासाठी जाणाऱ्या दिव्यांगांच्या सोयीकरिता तीनचाकी वाहन उपलब्ध करून देण्यात यावे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सेवा, सुविधांचा लाभ करून देण्यात यावा. तालुका वैद्याधिकाऱ्यांकडून दिव्यांग प्रमाणपत्र देताना भेदभाव करण्यात येत आहे. त्यांची बदली करण्यात यावी. अशा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे.