अनगोळ रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी
मोठ्या खड्ड्यात वाहन गेल्यास अपघात ठरलेलाच
बेळगाव : बडमंजीनगर, बाबले गल्ली क्रॉस (अनगोळ) येथून रेल्वे उड्डाण पुलालगत नाल्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व गटार करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरीवस्ती निर्माण झाली आहे. तसेच हा रस्ता अनगोळ येथील शिवारातही जातो. त्यामुळे या रस्त्यावरून शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सदर रस्त्यावरून शेतकरी जनावरांना गवत, भाजीपाला आणि शेतीची अवजारे ने-आण करत असतात. या ठिकाणी मातीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने, चालणेही अवघड जात आहे.
शेतकरी बांधव तर जनावरांना चारा आणताना डोक्यावरून मुख्य रस्त्यावर आणतात सायकल किंवा दुचाकीवरून आणल्यास खड्ड्यातून वाहन गेल्यास अपघात होत आहेत. रस्त्याच्या एकाच बाजूला गटार असल्याने दुसऱ्या बाजूचे पाणी रस्त्यावरून जाते. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. एका बाजूला असलेल्या गटारीच्या आसपास झाडे-झुडपे वाढल्याने कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. या हिंस्र कुत्र्यांमुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागते. या परिसरातून लहान मुले शाळेला येत जात असतात. पण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने रिक्षाचालक बाबले गल्ली बडमंजीनगर क्रॉस येथेच सोडतात. त्यामुळे पालकांना आपल्या लहान मुलांना घरापर्यंत चालत घेऊन जाव लागत आहे.
खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना सुरू झाला मणक्याचा त्रास
या खड्डेमय रस्त्यामुळे स्थानिक नागरिकांना मणक्मयाचे तसेच पाठीच्या कण्याचा, कमरेचा आणि नसा दबण्याचा विकार सुरू झाला आहे. त्यामुळे शक्मयतो वयस्कर नागरिक चालतच या रस्त्यावरून मुख्य रस्त्यापर्यंत येतात. नंतर वाहनातून जातात. पावसाळ्यात तर याठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. तसेच जागोजागी खड्ड्यांमुळे पाणी साचून राहते. त्यामुळे वाहनचालकांना याचा अंदाज येत नाही. त्यामुळे नागरिकांना आपली वाहने बडमंजीनगर येथे ठेवून आपल्या घरी चालत जाव लागते. त्यामुळे या स्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.