फोन टॅपिंग प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी
वृत्तसंस्था /हैदराबाद
तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीची सत्ता असताना त्या सरकारकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोट टॅप केले जाण्याचा आरोप अनेकवेळा झाला आहे. हा आरोप गंभीर असून त्याची सीबीआयकडून चौकशी केली जावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. शुक्रवारी या पक्षाच्या नेत्यांनी तेलंगणाच्या राज्यपालांची भेट घेऊन त्यांना या मागणीसंबंधातील एक निवेदन सादर केले आहे.n bया प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे. तसेच चार पोलिस अधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली आहे. तथापि, सध्याचे राज्य सरकार या प्रकारावर पांघरुण टाकण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेत्यांचे टेलिफोन टॅप करणे हा गुन्हा असून या कृतीमुळे खासगीत्वाच्या अधिकाराची पायमल्ली झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण राज्य सरकारकडून काढून घेऊन चौकशीसाठी सीबीआयकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. भारत राष्ट्र समिती सत्तेत असताना हे प्रकरण घडले आहे. त्यामुळे त्यावेळच्या राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे फोन टॅपिंग करण्यात आले, अशी शंका घेण्यास जागा आहे. म्हणून सविस्तर आणि सखोल चौकशीसाठी सीबीआयकडे ते दिले जावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या तेलंगणा शाखेने केली आहे.