दीपिका कुमारी, पार्थ साळुंखेला कांस्यपदके
तिरंदाजी विश्वचषकात भारताकडून 7 पदकांची कमाई
वृत्तसंस्था/ शांघाय
चीनमधील तिरंदाजी विश्वचषक-स्तर 2 मधील भारताची मोहीम रविवारी 7 पदकांसह संपुष्टात आली. भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीने उपांत्य फेरीतील पराभवानंतर कष्टाने कांस्यपदक मिळवत आपली प्रतिष्ठा राखली तसेच पार्थ साळुंखेनेही पहिल्यांदाच पदक मिळविले.
कंपाऊंड तिरंदाजांनी पाच पदके जिंकून दमदार कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दीपिका आणि साळुंखे यांनी रिकर्व्ह विभागात आणखी दोन पदके मिळवून भारताच्या मोहिमेचा शेवट उच्चांकावर केला. 21 वर्षीय ऑलिंपिक विजेत्या लिम सिह्योनने येचियोन विश्वचषकाच्या याच टप्प्यात दीपिकाचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्यानंतर एका वर्षाने भारतीय खेळाडूला पुन्हा एकदा उपांत्य फेरीत कोरियन खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला. मोठ्या प्रमाणात एकतर्फी ठरलेल्या या महिला रिकर्व्ह वैयक्तिक सामन्यात दीपिकाला 1-7 असा पराभव पत्करावा लागला.
पण 30 वर्षीय आणि चार वेळा ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या दीपिका कुमारीने कांस्यपदकासाठीच्या सामन्यात आणखी एक कोरियन खेळाडू कांग चाय यंगला 7-3 असे पराभूत करून जोरदार पुनरागमन केले आणि पदकांच्या मानकऱ्यांमध्ये स्थान मिळविले. दीपिकाच्या विजयामुळे भारताची एकूण पदकांची संख्या सहा झाली. शनिवारी कंपाउंड विभागात पाच पदके मिळून त्यात पुनरागमन करणारी तिरंदाज मधुरा धामणगावकरने उल्लेखनीय तीन पदके मिळवली होती.
पुऊषांच्या विभागात 60 व्या स्थानावर असलेल्या 21 वर्षीय साळुंखेला उपांत्य फेरीत अव्वल मानांकित आणि कोरियन दिग्गज किम वूजिनकडून 1-7 असा पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतर त्याने प्रभावी पुनरागमन केले आणि उच्च मानांकित फ्रेंच तिरंदाज बाप्तिस्त एडिसला पाच सेट्सच्या चुरशीच्या सामन्यात 6-4 असे पराभूत करत आपले पहिले विश्वचषक पदक जिंकले.