कव्हर ड्राईव्ह : ये क्या हुआ, कैसे हुआ!
दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांचा सामना ज्यावेळी सुरू झाला, त्यावेळी मी प्रचंड आशावादी होतो. अफगाणिस्तान कदाचित आज आपल्याला रौद्ररूप दाखवेल किंबहुना फलंदाजी करताना सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर बघायला मिळेल. पण जे काही काल घडलं ते सर्व अनपेक्षितच. क्रिकेटने काल पुन्हा एकदा आपली अनिश्चितता दाखवली. काही वर्षांपूर्वी सातच्या आत घरात हा मराठी चित्रपट आला होता. हा सामना सुरू होण्याअगोदर अफगाणिस्तान 60 धावांच्या आत तंबूत, असं जर कोणी भाकीत केलं असतं तर त्याला कदाचित वेड्यात काढलं गेलं असतं. आणि साहजिकच आहे कारण अफगाणिस्तानचे उपांत्य फेरीपूर्वीचे सामने आणि उपांत्य फेरीचा सामना यामध्ये बरीच तफावत होती. काही दिवसांपर्यंत अफगाणिस्तानचा सेन्सेक्स हा कमालीचा उंचावला होता. काल तो धाडकन खाली आला. कालचा सामना बघून मला भारताचे माजी यष्टिरक्षक चंद्रकांत पंडित यांची आठवण आली. आयपीएलमधील केकेआरचे सध्याचे फलंदाज प्रशिक्षक आहेत.
मला आठवते, ज्यावेळी मी मुंबई विऊद्ध दिल्ली रणजी करंडक सामन्याचे धावते समालोचन आकाशवाणीवरून करत होतो. सदर सामना हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात होता. अर्थात तो सामना मुंबईला काही जिंकता आला नव्हता. समालोचनाच्या शेवटच्या अर्ध्या तासात चंद्रकांत पंडित यांना समालोचन कक्षात आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी मी चंद्रकांत पंडित यांना मुंबईच्या एकंदरीत कामगिरीबद्दल प्रश्न केला होता. त्यावेळी चंद्रकांत पंडित म्हणाले होते की, आज मुंबईचा दिवसच नव्हता. नेमकं काल तेच चित्र अफगाणिस्तानबाबत बघायला मिळालं. काल अफगाणिस्तानचा दिवसच नव्हता. पूर्ण तयारी करून सुद्धा मनासारखा पेपर मात्र त्यांना सोडवता आला नाही. अर्थात काल खेळपट्टीवर काही चेंडू अचानक उसळत होते तर काही अचानक खालीही राहत होते. ज्या अफगाणिस्तानबद्दल भारतीय चाहते सुद्धा कमालीचे भावुक झाले होते, त्याच अफगाणिस्तानने भारतीयांना निराश केलं. बऱ्याच जणांचा असा आशावाद होता की अफगाणिस्तान निश्चितच अंतिम फेरीत प्रवेश करेल. परंतु रंग माझा वेगळा म्हणत पुन्हा एकदा क्रिकेटने आपला रंग दाखवला. परंतु हा रंग एवढाही काळाकुट्ट असेल, याची कल्पना निश्चितच क्रिकेट रसिकांना नव्हती.
काल जर आपण अफगाणिस्तानच्या फलंदाजांच्या धावफलकावर जर नजर टाकली तर तो धावफलक एखाद्या शहराच्या एसटीडी कोडप्रमाणे होता. एकाच फलंदाजाने फक्त दुहेरी आकडा गाठला. अफगाणिस्तानच्या पोथडीमध्ये जो दारूगोळा होता, जो उपांत्य फेरीअगोदरपर्यंत पूर्णत: संहारक होता. तो मात्र कालच्या सामन्यात फुसका आपटबार निघाला. सर्वसाधारणपणे क्रिकेटमध्ये उपांत्य फेरीचे सामने कमालीचे रंगतदार होतात. त्याला क्रिकेटही साक्ष आहे. परंतु काल क्रिकेटने उपेक्षा केली. बघता बघता सामना कधी सुरू झाला आणि कधी संपला हे कळलंच नाही. तबरेज शम्सीचा भेदक मारा आफ्रिकेच्या पथ्यावर पडला. सरते शेवटी दक्षिण आफ्रिकाने आपल्या हातावर लिहिलेला चोकर्सचा डाग मात्र पुसून टाकला. प्रथमच ते आयसीसीच्या कुठल्याही मोठ्या इव्हेंटमध्ये अंतिम फेरीत बघायला मिळणार आहेत. बऱ्याच वर्षापासून देवाला घातलेले साकडे आज खऱ्या अर्थाने फळास आलं. हा लेख वाचत असताना तुम्हाला भारत विऊद्ध इंग्लंडमधील विजेताही मिळेल. जाता जाता मला राजेश खन्नाच्या ‘अमर प्रेम’ चित्रपटातील ते गीत आठवलं. ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, क्यूं हुआ, अरे छोडो ये ना सोचो!
विजय बागायतकर