रणरणत्या उन्हात मातीच्या बाटलीचा 'थंडावा'
कळंबा / सागर पाटील :
उन्हाळ्याचा तडाखा अधिकच तीव्र झाला असताना, शहरवासीय पारंपरिक उपायांकडे वळताना दिसत आहेत. तापमान चाळीशी पार करत असतानाच, थंड पाणी मिळवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी मातीच्या बाटल्यांचा पर्याय कोल्हापूरकरांनी स्वीकारला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये या मातीच्या बाटल्या विक्रीसाठी ठिकठिकाणी ठेवलेल्या दिसत आहेत. वाहनधारकांकडून या बाटलीला मोठी मागणी आहे.
गेल्या काही वर्षांत विस्मरणात गेलेल्या या पर्यायाने आता पुन्हा एकदा लोकांमधून लोकप्रियता मिळवली आहे. रस्त्यांवर हातगाड्यांमधून, कडेला असलेल्या दुकानांतून या बाटल्यांची मागणी वाढताना दिसत आहे. या मातीच्या बाटल्या आकाराने साधारणपणे प्लास्टिकच्या बाटल्यांसारख्या असल्या तरी त्यांची वैशिष्ट्यो वेगळीच आहेत. पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते, त्याला एक सौम्य गोडसर चव येते आणि कोणतेही रसायन नसल्यामुळे आरोग्यदृष्ट्या हानिकारक नाहीत. कोल्हापूर जिह्यातील वारनुळ, हेरवडे, गारगोटी आणि इतर काही गावांतील कुंभार या बाटल्या पारंपरिक कुंभारकामातून तयार करत आहेत. त्यामुळे स्थानिक उद्योगालाही चालना मिळत आहे. शहरातील नागरिक प्लास्टिकऐवजी मातीच्या बाटल्या पसंत करत आहेत. हा एक नागरिकांतून सकारात्मक नवीन बदल घडताना दिसत आहे.
सध्या या बाटल्या 100 ते 150 रुपयांच्या दरम्यान सहज उपलब्ध आहेत. बाजारातील ही वाढती मागणी पाहता, ही पारंपरिक शैली आता केवळ पर्याय न राहता गरज होत चालली आहे.
- उपनगरवासीयांकडून पसंती
मातीची बाटली केवळ पाणी थंड ठेवण्यापुरती मर्यादित नाही, तर ती आरोग्य, पर्यावरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचे प्रतीक ठरत आहे. उपनगरात राहणारे व शहरात कामानिमित्त येणाऱ्यांमध्ये या बाटलीच्या मागणीत वाढ आहे. त्यांना ही बाटली आरोग्यदायी व दिवसभर पाणी पिण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.