बापट गल्ली परिसरात दूषित पाणीपुरवठा
एलअँडटी कंपनीकडे दुरूस्त करण्याची मागणी
बेळगाव : बापट गल्ली येथील मशिदीजवळ मागील काही दिवसांपासून ड्रेनेजमिश्रित पाणी पुरवठा केला जात आहे. एलअँडटी कंपनीकडे तक्रार देऊनदेखील अद्याप शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून जलवाहिनीची दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. बापट गल्ली येथे मागील आठ ते दहा दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा केला जात होता. पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी त्याची तक्रार एलअँडटी कंपनीसह महानगरपालिका व स्थानिक नगरसेवकाकडे केली. त्यानंतर काही ठिकाणी खोदाई करून दुरुस्ती करण्यात आली. तरीदेखील अशुद्ध पाणीपुरवठा सुरूच असल्याने नागरिक संतापले आहेत.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
ड्रेनेजमिश्रित पाणी घरांमध्ये सोडले जात असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती वर्तविली जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तात्काळ जलवाहिनीची दुरुस्ती करून शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे.