दोन वर्षांत जिल्ह्यात 212 तलावांची निर्मिती
जि. पं. अधिकाऱ्यांची माहिती : रोहयोतून आणखी तलाव खोदणार
बेळगाव : ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यामध्ये 2021-22 व 2023-24 या दोन वर्षांत 212 तलाव खोदण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील गावांना पाण्याची सोय झाली आहे. भविष्यामध्ये तलावांची गरज लक्षात घेऊन आणखी तलाव खोदण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. रोजगारासाठी ग्रामीण भागातील जनता स्थलांतरित होत होती. याला प्रतिबंध घालण्यासाठी रोजगार हमी योजनेतून आहे त्या ठिकाणीच रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतवडीतील रस्ते, नाले खोदाई, तलावातील गाळ काढणे, नवीन तलाव खोदाई करणे अशी कामे हाती घेतली जात आहेत. पाण्याची गरज लक्षात घेऊन तलाव खोदाई करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. जागा उपलब्ध असलेल्या ठिकाणी व जुन्या तलावांमधील गाळ काढून त्या ठिकाणी अमृत सरोवर योजनेंतर्गत तलावांचा विकास करण्यात आला आहे. या माध्यमातून पाणी साठवून नागरिकांसाठी पाण्याची सोय करून दिली जात आहे. यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण होऊन नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत तलाव असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन आणखी तलाव निर्माण करण्याची योजना आखण्यात आली आहे, असे जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
रोजगार हमी योजना राबविण्यात जिल्हा पंचायतीला यश
बेळगाव जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजना राबविण्यात जिल्हा पंचायतीला यश आले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये 212 तलाव निर्माण करण्यात आले आहेत. यामध्ये बेळगाव तालुक्यात 43, चिकोडी 27, बैलहोंगल 14, हुक्केरी 14, खानापूर 14, रामदुर्ग 19, रायबाग 11, सौंदत्ती 17, अथणी 9, गोकाक 8 व इतर तालुक्यांमध्ये 16 तलाव निर्माण करण्यात आले आहेत.