For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस अधिवेशन : काडी पैलवान किंगकाँग कधी बनणार?

06:31 AM Apr 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस अधिवेशन   काडी पैलवान किंगकाँग कधी बनणार
Advertisement

काँग्रेसने गुजरातमध्ये अधिवेशन भरवून एक चांगले केले. ‘आम्ही कितीही पिचले गेलेलो असू तरी आमचा पीळ कायम आहे. आमची अंतिम हार झालेली नाही आणि लढाईला आम्ही सिद्ध आहोत’ असाच जणू संदेश राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदींना ललकारून दिला.

Advertisement

तीन लोकसभा निवडणूका आणि नुकत्याच महाराष्ट्रासह झालेल्या तीन राज्यांच्या निवडणूकांत पानिपत झाल्यावर शेवटी काँग्रेसला जाग आली असे जरी कोणी म्हणाले तरी ते वावगे ठरणार नाही. ‘जब जागे तब सवेरा’, अशी हिंदीमध्ये एक म्हटली तर सरळ पण बघितल तर तिरकी म्हण आहे तसेच काहीसे 11 वर्षानंतर का होईना काँग्रेसचे झालेले आहे. म्हटले तर गंमतीशीर पण प्रत्यक्षात फार गंभीर गोष्ट ही आहे की 2014च्या मे महिन्यात राष्ट्रीय स्तरावर मोदींचा उदय झाल्यापासून काँग्रेस कधी स्वत:शी बोललीच नाही. आपले काय चुकते आहे आणि आता काय बरोबर केले पाहिजे याबाबत सखोल चर्चा राहुल गांधी अथवा त्यांच्या भाट मंडळींनी कधी केलीच नाही/ कधी होऊच दिली नाही. ज्याला जे समजायचे ते त्याने समजावे. पण अशा वागण्याला कर्मदरिद्रीपणा म्हणतात.

अहमदाबादमध्ये देखील पूर्णपणे बेबाक चर्चा झाली असे नाही. शशी थरूर यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षाचे काय काय चुकत आहे त्याबाबत जमालगोटा दिला खरा पण असे करणारी फार मंडळी नव्हती. थरूर यांनी तरुणवर्ग काँग्रेसकडे कसा आकृष्ट होईल याकडे लक्ष देण्याची गरज सांगितली. एव्हढेच नव्हे तर भाजपचा मतदार त्याच्याकडेच कसा आणि का बरे आहे याचाही अभ्यास करण्याचे महत्त्व सांगितले. थरूर यांना राजकीय प्रस्तावाला अनुमोदन करायला लावून काँग्रेसने पक्षातील टीकाकारांना देखील चुचकारण्याचे काम केले. दरबारी राजकारणाने काँग्रेसची दुर्दशा झालेली असली तरी अजूनदेखील नेतृत्वापुढे त्याच्या नाकर्तेपणाचे पाढे वाचणे बऱ्याच जणांना शिष्टसंमत वाटत नाही. उद्या आपले तिकीट गांधी घराण्याच्याच हातात आहे हे त्यांना माहित आहे. काँग्रेसमध्ये भाजपचे फितूर किती वरपर्यंत पोहचले आहेत ते गुलाम नबी आझाद प्रकरणाने ढळढळीतपणे पुढे आले आहे. कमल नाथ हे भाजपमध्ये चालले होते पण भाजपनेच ते ऑपरेशन एबॉर्ट केल्याने मागे फिरले. जर उच्च पदावरील मंडळी असे करत असतील तर खालच्या स्तरावर तर सावळागोंधळ असणार हे ठरलेले. माणसापरास मेंढरे बरी असे कोणी म्हटले आहे.

Advertisement

मोदी-शहा हे साम-दाम-दंड-भेद या साऱ्या तंत्रांचा यथेच्छ वापर करतात, अशी कीर्ती सगळीकडे पसरली असल्याने विरोधकांवर वेळोवेळी नांगर फिरवला जातो असे आरोप वाढतच आहेत. भाजप हा कधी नियमानुसार खेळतच नसल्याने लोकशाहीतील सर्व संस्थांचा गैरवापर करत विरोधकांचे कांडात काढायचे राजकारण तो करतो हे राहुल गांधी यांची लोकसभा सदस्यता भंग करण्यावरून दिसून आले. ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ हे म्हणणे प्रत्यक्षात अजिबात बरोबर नसेल आणि मोदींच्या जमान्यात तर पूर्णपणे चुकीचे असेल पण स्वातंत्र्योत्तर काळात बहुतांशी वेळ काँग्रेस सत्तेत राहिली असल्याने लोक भाजपला वैतागून परत आपल्याकडे येतील अशी बाळबोध धारणा बऱ्याच काँग्रेसी नेत्यात असल्याने पक्षाचा घात झालेला आहे. जग फार बदलत आहे आणि कालचे आज ‘होत्याचे नव्हते’ होत आहे. अशावेळी नेहरू आणि इंदिरा गांधींच्या काळातील पक्षाच्या सुवर्णकाळाची आठवण काढून फारसे काही होणार नाही.

काँग्रेस हा एक अवाढव्य आणि अतिप्रचंड हत्ती आहे आणि त्याला हालायला  केवळ वेळ लागतो एवढेच नाही तर कधीकधी त्याला हलताच येत नाही आणि जेव्हा तो हलतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे अहमदाबादमध्ये झालेले काँग्रेसमधील विचारमंथन स्वागतार्हच पण ते 10 वर्षांपूर्वी झाले असते तर एव्हाना मार्ग पण मिळाला असता. आपल्याल्याच सारे काही ठाव आहे असे जर कोण नेत्याने घेतले तर त्याला शिकायला वेळ लागतो. जे काही शिकलेले आहे ते अगोदर विसरायला लागते. आता अधिकृतपणे 99 जागा मिळवून लोकसभेत काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष झालेला असला तरी त्याला यशाची चावी सापडलेली आहे असे म्हणता येणार नाही. ‘जादू की झप्पी’ सिनेमातच फक्त ठीक असते.   मोदींच्या उदयाने न भूतो, न भविष्यती असे आव्हान पक्षापुढे उभे राहिलेले आहे. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे 12 महिने, 24 तास राजकारण करणारे आहेत. त्यांना उसंत नाही आणि भाजपमधील कोणाला ते उसंत घेऊ देत नाहीत. पंचाहत्तरी पार केलेल्या नेत्यांना त्यांनी मार्गदर्शक मंडळात फेकून दिलेले आहे. हाताची घडी आणि तोंडावर बोट अशी त्यांची अवस्था केलेली आहे.

काँग्रेसची जमेची बाजू म्हणजे भारत जोडो यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रेनंतर राहुल हे पक्षाचे सर्वमान्य नेता म्हणून पुढे आले आहेत. राज्यकर्त्यांपेक्षा त्यांना राजकारण जास्त कळत नसले तरी एक लोकांच्या जीवाभावाचा नेता अशी त्यांची बनलेली छबी दिवसेंदिवस मोठी होत आहे. मोदी-शहा यांच्याशी दोन हात करणारे ते एकमेव विरोधक आहेत, अशी प्रतिमा लोकांच्या मनात तयार झालेली आहे. विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला बरोबर घेऊन काम करण्याची राहुल यांनी जणू शपथच घेतली असल्याने आज ना उद्या विरोधकांना बाळसे यायला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे.

गांधी घराण्याचा वारसा म्हणून राहुल यांच्याकडे पक्षाचे नेतृत्व आले असल्याने त्यांना राजकारणातील छक्के-पंजे देखील माहित नाहीत आणि सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करायला लावणारी प्रभावी रणनीती देखील आखता येत नाही. कोण आपला आणि कोण परका हे कधीकधी त्यांना कळेनासे झालेले आहे. पण याचा अर्थ ते चूप बसलेले आहेत असा नव्हे. शून्यातून विश्व निर्माण करणारे ते विश्वकर्मा नव्हेत पण राखेतून ते पक्ष उभे करू लागले आहेत. जिल्हास्तरावर संघटना बळकट करण्याचा झालेला निर्णय जर व्यवस्थितपणे राबवला तर पक्षाला फायदेशीर ठरू शकतो. व्यापार युद्धाने उत्पन्न झालेल्या स्फोटक स्थितीने राजकारणावर परिणाम होणार आहे.

याचबरोबर भाजपमध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संबंधात पुढील भाजप अध्यक्ष कोण असावा या मुद्यावर अस्वस्थता वाढलेली आहे. गेले वर्षभर जे पी न•ा यांचा उत्तराधिकारी निवडण्यात मोदींना आलेले अपयश म्हणजे सत्ताधारी पक्षात सारे काही आलबेल नाही अशी कुजबुज सुरु झालेली आहे. पुढील महिन्याभरात भाजपमध्ये कशाकशा आणि काय काय घटना घडणार आहेत, याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. पंतप्रधान झाल्यावर 11 वर्षांनी मोदींना नागपूरला जाणे भाग पडावे याचा अर्थ त्यांना पुढील भाजप अध्यक्ष आपला रबर स्टॅम्प बनवता येणार काय याबाबत देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे.   देशाचे राजकारण एका निर्णायक वळणावर आले आहे. जहाल हिंदुत्वाच्या राजकारणाच्या मर्यादा देखील दिसू लागल्या आहेत. रोटी, कपडा, मकानवर पुढील लढाई आली तर लोक कोणाचा जयजयकार करणार हा लाखमोलाचा प्रश्न आहे.

आता नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर आरोपपत्र दाखल करून मोदी-शहा हे हादरलेले आहेत असेच दाखवून देते. ‘माझे पणजोबा (पंडित नेहरू) यांनी 12 वर्षे तुरुंगात काढली तर दहा वर्षे मला देखील ‘आत’ ठेवले तर काय होते?’ असे सांगून राहुल यांनी सरकारला ललकारलेच आहे. येता महिना हा रोमहर्षक राहणार हे नक्की.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.