युतीचा निर्णय घेण्यास काँग्रेसकडून टाळाटाळ
आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांची टीका
पणजी : काँग्रेस पक्ष आज -उद्या करीत युतीचा निर्णय घेण्यास उशीर करत असल्याची टीका आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी केली आहे. युतीसाठी थांबून आम्ही मागे पडलो. अजून वेळ वाया नको म्हणून पक्षाने उमेदवार जाहीर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युतीबाबत आरजीपी लवकरच काय ते कळवेल, असा खुलासाही बोरकर यांनी केला आहे. युतीची वाट पाहून आम्ही थकलो. शेवटी युतीसाठी अंतिम निर्णय घेताना कुठेतरी मर्यादा असणे आवश्यक आहे. युती होणार म्हणून असे अनेक दिवस वाया घालविले तर त्याचा परिणाम उमेदवारांच्या प्रचारावर होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. युती योग्य वेळेत झाली तरच त्याच लाभ होऊ शकतो. त्यासाठी दिवस वाया घालविण्यात अर्थ नाही, असेही बोरकर यांनी नमूद केले. अजूनही युतीबाबत ठामपणे काही सांगता येत नाही. हालचाली नसल्याने शेवटी आरजीपीचे उमदेवार जाहीर करणे भाग पडले. अनेक जागांवर काँग्रेस व आरजीपीचे उमेदवार जाहीर करण्यात आल्यामुळे युती होण्याची शक्यता मावळली आहे. दरम्यान, युती होणार म्हणून तिसरा पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डने सावध भूमिका घेतली असून आपले पत्ते खुले केले नाहीत.