काश्मीरमधील सभेत भाजपवर बरसले खर्गे
वृत्तसंस्था/ अनंतनाग
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. बुधवारी जम्मू-काश्मीरच्या अनंतनागर येथील सभेला संबोधित करताना खर्गे यांनी जर आमच्या 20 जागा अधिक आल्या असत्या तर भाजपचे अनेक जण तुरुंगात असते असा दावा केला आहे. 400 पारचा दावा करणारा भाजप 240 वरच रखडला. काँग्रेसला आणखी 20 जागा मिळाल्या असत्या तर भाजपचे नेते निश्चितपणे तुरुंगात दिसून आले असते. भाजपचे हे नेते तुरुंगात राहण्याच्याच योग्यतेचे आहेत. भाजपने कितीही प्रयत्न केला तरीही काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी जम्मू-काश्मीरमध्ये कमकुत होणार नाही. आम्ही संसदेत आमची शक्ती दाखवून दिली आहे, आम्ही त्याच शक्तिनिशी वाटचाल करणार आहोत असा दावा खर्गे यांनी केला.
जम्मू-काश्मीरमध्ये भाजप लोकांना धर्माच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु भाजपचा हा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही. भाजप आणि संघाचे हजारो कार्यकर्ते आले तरीही येथील लोक झुकणार नाहीत. काँग्रेस पक्ष येथील लोकांसोबत आहे. आम्ही सर्व एक आहोत आणि नेहमीच एक राहू असे खर्गे म्हणाले. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी पाहून भाजप बिथरला आहे. याचमुळे भाजप जम्मू-काश्मीरमधील उमेदवारांची यादी वारंवार बदलत आहे. भाजपमध्ये बंडखोरी सुरू झाली आहे. इंडिया आघाडीच्या एकतेमुळे भाजप घाबरल्याचे यातून स्पष्ट होते असे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी सर्वात मोठी यात्रा काढली, कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत ही यात्रा होती. काश्मीरमध्ये या यात्रेचा समारोप झाला. भारत जोडो यात्रेत फारुख अब्दुल्लांसोबत मी देखील सामील झालो होतो. त्या यात्रेला काश्मीरमध्ये मोठे यश मिळाल्याचा दावा खर्गे यांनी केला आहे.