काँग्रेस पक्ष एका कुटुंबाचा गुलाम
पंतप्रधान मोदींची राजस्थानात प्रचारसभा
राजस्थान निवडणुकीसाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता राज्यातील प्रचाराचा कालावधी संपुष्टात येणार आहे. याचमुळे भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी बुधवारी अनेक ठिकाणी मोठ्या प्रचारसभा घेतल्या आहेत. भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जगतप्रकाश न•ा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत भाजपच्या अनेक नेत्यांनी राजस्थानात प्रचारसभांना संबोधित केले आहे. तर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी उदयपूर येथे काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचार केला आहे.
पंतप्रधान मोदींनी राजस्थानच्या सागवाडा येथे विशाल सभेला संबोधित केले. राजस्थानची भूमी शूरवीरांची आहे. या वीरांनी महाराणा प्रताप यांची महती वाढविण्याचे काम केले आहे. कालीबाईंचे बलिदान, मानगढ धाममध्ये बलिदान देणाऱ्या गोविंद गुरुंच्या अनुयायांना मी नमन करतो. ज्या भूमीला अचूक भविष्यवाणीसाठी मावजी महाराजांचा आशीर्वाद मिळाला आहे, त्या भूमीवर भाजप सत्तेवर येत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
मावजी महाराज यांचा आशीर्वाद घेत एक भविष्यवाणी करण्याचे धाडस करत आहे. राजस्थानात आता कधीच अशोक गेहलोत यांचे सरकार सत्तेवर येणार नाही. राजस्थानच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज येत आहे, लोक ‘गेहलोत जी, कोनी मिले वोट जी’ (गेहलोतांना मतदान नाही) असे म्हणत असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
लाल डायरीचा उल्लेख
राजस्थानात शासकीय भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्यांवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार शाब्दिक प्रहार केला आहे. काँग्रेस सरकारने राजस्थानात प्रत्येक भरती प्रक्रियेत घोटाळे केले आहेत. काँग्रेस नेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये अशाप्रकारचा व्यवहार आहे, की त्यांची मुले अधिकारी झाली तर सर्वसामान्यांच्या मुलामुलींना वेचून वेचून भरती प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. याचमुळे काँग्रेसला आता राजस्थानच्या भूमीवरून साफ करावे लागणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे. कृष्णकृत्यांची नोंद असलेल्या लाल डायरीची पाने उलटण्यासोबत काँग्रेस सरकारचे घोटाळे समोर येत आहेत. कुशासन असलेल्या या काँग्रेस सरकारला सत्तेवरून हाकलण्याची संधी लोकशाहीने जनतेला दिली आहे. ही संधी गमावू नका असे मोदींनी जनतेला उद्देशून म्हटले आहे.
काँग्रेसला साफ करा, भ्रष्टाचारापासून मुक्त व्हा
काँग्रेसला सत्तेवरून हटवत अत्याचार आणि भ्रष्टाचारापासून राज्याला मुक्त करा असा नारा मोदींनी दिली आहे. केंद्र सरकारची प्रत्येक योजना राज्यात लागू करता यावी म्हणून राजस्थानात काँग्रेसचे सरकार पायउतार होण्याची गरज आहे. जनतेची स्वप्नं हाच माझा संकल्प असून तो पूर्ण करण्याची माझी इच्छा आहे, याचमुळे सर्व अडथळे दूर करा असे मोदींनी उपस्थित जनसमुदायाला उद्देशून म्हटले आहे.