दिलेले वचन काँग्रेस पक्षाने पाळले
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर : जनतेचा विश्वास मिळविणे शक्य : ग्रामीण मतदारसंघात प्रचार
बेळगाव : लोकप्रतिनिधींमध्ये प्रामाणिकता असणे आवश्यक आहे. वेळेनुसार बदलणाऱ्या नेत्याला जनता स्वीकारणार नाही. आपल्या कुटुंबीयाने, पक्षाने जनतेला दिलेले वचन पाळले आहे. त्यामुळेच जनतेचा विश्वास मिळविणे शक्य झाले आहे, असे महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील कुद्रेमनी, कल्लेहोळ आदी गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या. आपण आमदार असताना दिलेले वचन पाळले आहे. त्यामुळेच दुसऱ्या वेळी मतदारांनी भरघोस मते देऊन आपल्याला निवडून आणले आहे. संपूर्ण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखविला आहे. मतदारांकडून असे प्रेम बहुतेक दुसऱ्या कोणत्या लोकप्रतिनिधीला क्वचितच मिळाला असेल. आपण कामानिमित्त बेंगळूर अथवा इतर ठिकाणी गेलो असलो तरी आपले बंधू आमदार चन्नराज हट्टीहोळी, मुलगा मृणाल हेब्बाळकर, नेहमीच नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. कोरोना काळात आम्ही केलेले काम जनतेने पाहिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मृणाल हेब्बाळकर यांना सेवेची संधी देण्यात यावी. त्यांना भरघोस मते देऊन विजयी करण्यात यावे. काँग्रेस पक्षाने निवडणुकीदरम्यान दिलेले वचन पाळले आहे. गॅरंटी योजना समर्पकपणे राबवून प्रत्येक कुटुंबाला मदत दिली जात आहे. एजंटांचा हस्तक्षेप नसताना योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत, असे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले. यावेळी युवराज कदम, पक्षाचे कार्यकर्ते, नेते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.