भाजपच्या विकासमार्गावरून काँग्रेसचा प्रवास : तानावडे
रमाकांत बोरकर यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश : कुठ्ठाळीत मताधिक्क्य मिळणार
पणजी : भाजपच्या विकासमार्गावरून काँग्रेसचा प्रवास सुरू आहे, अशी टिपणी भाजपा गोवा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद तानावडे यांनी बुधवारी केली. सहा वेळा सांकवाळचे सरपंचपद भूषविलेले रमाकांत बोरकर यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यानिमित्त भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान तानावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे टिपणी केली. व्यासपीठावर माजी खासदार विनय तेंडुलकर, चंद्रकांत गावस, अच्युत नाईक, उदय गावकर आणि नारायण नाईक यांची उपस्थिती होती. मंगळवारी गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केला. त्यासाठी इंडिया आघाडीच्या पक्षप्रतिनिधींच्या समवेत या उमेदवारांनी पत्रादेवी हुतात्मा स्मारकापर्यंत बसने प्रवास केला. तेथून ते मडगावात लोहिया मैदानाकडे गेले. त्यावेळी बोलताना त्यापैकी एकाने, चांगल्या रस्त्यांमुळे हा प्रवास सुखकर झाला व आम्ही वेळेत (फास्ट) पोहोचलो असे वक्तव्य केले होते, असे तानावडे यांनी सांगितले. काँग्रेसकडून भाजपला मिळालेले हे प्रशस्तीपत्र असून त्यावरून भाजपच चांगल्याप्रकारे राज्याचा विकास करू शकतो, हेच स्पष्ट होत आहे, असे तानावडे म्हणाले.
हाच प्रवास काँग्रेसकाळात केला असता तर..?
हाच बसप्रवास त्यांनी काँग्रेसच्या सत्ताकाळात केला असता तर संपूर्ण दिवस सरला असता तरीही मडगाव ते पत्रादेवी आणि परत असा प्रवास करणे शक्य झाले नसते. आज राज्यातील बहुतेक रस्ते महामार्गांमध्ये ऊपांतरीत झालेले आहेत. फ्लायओव्हरमुळे कुठेही वाहतुकीची कोंडी न होता सुखकर प्रवास करणे शक्य झाले आहे. त्याचा अनुभव खुद्द इंडिया आघाडीतील प्रतिनिधींनीही घेतला व त्याबद्दल भाजपचे कौतुकही केले, असे तानावडे यांनी सांगितले.
कुठ्ठाळीत भाजपला मिळणार मोठे मताधिक्क्य
बोरकर यांच्या पक्षप्रवेशामुळे कुठ्ठाळी मतदारसंघात भाजप उमेदवाराला मोठा लाभ होईल, असा विश्वासही तानावडे यांनी व्यक्त केला. वर्ष 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे ध्येय बाळगून वावरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आजचा हा पक्षप्रवेश खारीचा वाटा उचलेल, असेही ते म्हणाले.
अनेकजण दाखल होतायत भाजपात
आज असंख्य सुशिक्षित लोक भाजपकडे आकर्षित होत आहेत. गत महिन्याभरात अनेक डॉक्टर्स, चार्टर्ड अकाऊंटंट, वकील, आदींनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्याशिवाय मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवरील स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकही भाजपमध्ये येत आहेत.
राखीवता नसतानाही दिला महिला उमेदवार
भाजपने राखीवता नसतानाही दक्षिण गोव्यात महिला उमेदवार दिला आहे. पंतप्रधानांनी यापूर्वीच महिला हीच भाजपची खरी ताकद असल्याचे म्हटले आहे, त्याचाही फायदा भाजपला होत असून अधिकाधिक महिला भाजपकडे ओढल्या जात आहेत. आज बोरकर यांच्यासमवेत प्रवेश घेतलेल्या महिलांच्या संख्येवरून हे स्पष्ट होत आहे, असेही तानावडे म्हणाले. प्रारंभी तानावडे यांच्याहस्ते बोरकर यांना शाल, गुलाबपुष्प आणि प्रवेशपावती देऊन पक्षात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचेही शाल आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.