काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनांमुळे गोरगरिबांना मदत : प्रियांका जारकीहोळी
यमकनमर्डी मतदारसंघात प्रचार
बेळगाव : काँग्रेस सरकारने प्रारंभ केलेल्या गॅरंटी योजनांमुळे नागरिकांना मदत मिळाली आहे. विकासकामांवरही भर दिला जात आहे. अशा प्रकारे सामाजिक न्यायाच्या बाजूने असणाऱ्या काँग्रेस पक्षाला पाठिंबा देऊन निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केली. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील चंदगड, रामापूर, मास्तीहोळी, कबलापूर, रंगधोळी गावांना भेट देऊन प्रचार केला. त्या म्हणाल्या, भाजप सरकारच्या केंद्र व राज्यातील नेत्यांकडून खोटी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल करीत आहेत. वर्षाला 2 कोटी रोजगार देण्याच्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. अशा प्रकारे खोटी आश्वासने देऊन नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. बोले तैसा चाले वागणाऱ्या काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसच्या गॅरंटी योजनांमुळे राज्यातील गोरगरीब जनतेला मदत मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने दिलेले वचन पाळले आहे. महिलांनी याची जाणिव ठेवून काँग्रेसला पाठिंबा द्यावा, असे सांगितले. यावेळी काँग्रेस नेते अरविंद कारची यांच्यासह कार्यकर्ते, नेते, ग्रा. पं. सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.