काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पक्ष इंधन दरवाढीवरून आक्रमक
इव्हेंट मॅनेजमेंट बंद करण्याचा सरकारला सल्ला
पणजी : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच करण्यात आलेली वीज दरवाढ आणि आता इंधन दरवाढ या मुद्यांवरून काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. ही दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, अन्यथा दक्षिण गोव्यातील जागा गमवावी लागल्याचा वचपा काढण्यासाठी हे सरकार सामान्य जनतेवर महागाई लादत आहे, असा सर्वसामान्यांचा समज होईल, असा इशारा दिला आहे.विद्यमान सरकार हे पूर्णत: असंवेदनशील असून लोकसभा निवडणूक संपताक्षणीच त्यांनी जनतेवर महागाई लादून आपला खरा चेहरा समोर आणला आहे. इंधनावरील व्हॅट वाढवताना पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1 ऊपया आणि डिझेलच्या दरात 36 पैशांनी वाढ केली आहे.
एका बाजूने हे सरकार इव्हेंट आयोजनावर वारेमाप वायफळ खर्च करत आहे आणि त्याची भरपाई जनतेवर महागाई लादून करत आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काटकसरीचे उपाय अवलंबवावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.वीज दरवाढीमुळे जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही, ही मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया भाजप सरकारचा ‘गरीब विरोधी’ अजेंडा उघड करते. या सरकारला सर्वसामान्यांच्या त्रासाची पर्वा नाही, असे आलेमाव पुढे म्हणाले. यापूर्वी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करून पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात खाली आणले होते. आज त्यांचे ‘राजकीय वारसदार’ म्हणणारे डॉ. सावंत यांनी व्हॅट वाढवून नेमकी विरोधी कृती केली आहे. ही दरवाढ त्वरित मागे न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आलेमाव यांनी दिला आहे.
आता इंधनाची भाववाढ : कामत
दरम्यान, गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांनी इंधन दरवाढीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, दक्षिण गोव्यातील जागा गमवावी लागल्याचा वचपा काढण्यासाठीच ही दरवाढ केल्याचा दावा केला आहे. यापूर्वी हल्लीच या सरकारने प्रति युनिट 60 ते 90 पैसे अशी वीज दरवाढ केली होती. त्यानंतर आता लगेचच इंधन दरवाढ केली. मुख्यमंत्र्यांसाठी भलेही ही दरवाढ नगण्य असेल, परंतु सर्वसामान्य गरीब जनतेसाठी किती खर्चिक असते त्याचा अनुभव मुख्यमंत्र्यांना नसेल, असे कामत यांनी म्हटले आहे. हे सरकार इव्हेन्ट मॅनेजमेंटवर कोट्यावधी खर्च करते तो त्यांनी बंद करावा व तोच पैसा जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी वापरावा, असा सल्लाही कामत यांनी दिला आहे.