बंगालमध्ये राहूल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा!
वृत्तसंस्था/ कोलकाता
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुन्हा पश्चिम बंगालमध्ये पोहोचली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी झटका देत या यात्रेचे उपरोधिक स्वागत केले आहे. ममता बॅनर्जी यांनी मालदा येथे सभा घेत काँग्रेसवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. काँग्रेसकडे राज्यात स्वत:चा एकही आमदार नाही, तरीही ते आम्हाला लोकसभेचे दोनहून अधिक मतदारसंघ सोडण्यास सांगत होते. तृणमूल काँग्रेस आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावरच लढविणार नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी बुधवारी म्हटले आहे.
भाजपविरोधात आम्ही स्वबळावर लढणार आहोत. भाजपला केवळ तृणमूल काँग्रेसच पराभूत करू शकते. काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये दोन जागा सोडण्याची आम्ही तयारी दर्शविली होती. परंतु काँग्रेसने अधिक जागांची मागणी केल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच बीएसएफकडून ओळखपत्र जारी करण्याच्या प्रक्रियेवर त्यांनी नाराजी व्यक्त करत गरज भासल्यास कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षांनी मालदा येथील लोकांना मतदारयादीत स्वत:चे नाव जोडण्याचे आवाहन केले आहे.
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा ही पश्चिम बंगालच्या मालदा आणि मुर्शिदाबाद जिल्ह्यातून जाणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील मतदारसंघांत काँग्रेसने 2019 च्या निवडणुकीत विजय मिळविला होता.