काँग्रेस उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब
उत्तरेत खलप, दक्षिणेत विरियातो यांची नावे जाहीर
पणजी : तब्बल 13 याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरही गोव्यासाठी एकही उमेदवार जाहीर करण्यात विलंब लावणाऱ्या काँग्रेसने अखेर शनिवारी उत्तर गोव्यातून माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप आणि दक्षिण गोव्यातून कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या नावांची घोषणा केली. त्यामुळे कैक दिवसांपासून राज्यभरात चाललेल्या चर्चा, प्रदीर्घ प्रतीक्षा तसेच पक्षांतर्गत धुसफूस यासारख्या मुद्यांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरचिटणीस (राजकीय) के. सी. वेणुगोपाल यांच्यासमक्ष प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर आणि आपचे राज्य संयोजक अमित पालेकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर केली. उमेदवारी निश्चितीवरून काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी चालली होती. खरे तर उत्तर गोव्यासाठी सर्वात आधी अॅड. खलप यांचेच नाव जवळजवळ निश्चित झाले होते. परंतु अंतर्गत गटबाजीमुळे त्यांच्या नावाची घोषणा होण्यात विलंब झाला होता. खलप यांच्यासह विजय भिके आणि सुनिल कवठणकर हेही इच्छुक असल्यामुळे दिल्लीतील बैठकीत उमेदवार निश्चितीवेळी वरिष्ठांनी ठरवलेल्या नावांना स्थानिक नेत्यांची संमती मिळणे कठीण झाले होते.
असाच काहीसा प्रकार दक्षिण गोव्यातही सुरू होता. या मतदारसंघातून आपणास उमेदवारी मिळेल या विश्वासातून माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्वत:च्या पातळीवर तेथे प्रचारकार्यही प्रारंभ केले होते. त्याशिवाय दक्षिणेसाठी अमित पाटकर, युरी आलेमाव यांच्याही नावांचा विचार पक्षीय पातळीवरून सुरू होता. परंतु शेवटच्या क्षणी विरियातो यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचा पत्ता कट झाला असून त्यावर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली नसली तरी, ’या प्रकारामुळे आपण किंचित नाराज झालो आहे पण दुखावलेलो नाही’, असे स्पष्ट केले आहे. गत 50 वर्षांपेक्षा जास्त काळापासून आपण राजकारणात आहे. त्यापैकी 20 वर्षे खासदार राहिलेलो आहे. या काळात लोकांची फार मोठी जनसेवा केली आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला आहे तो आपणास मान्य आहे व यापुढेही आपण पक्षासाठी कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दक्षिण गोवा हा मतदारसंघ ख्रिस्तीबहुल असल्यामुळे कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना उमेदवारी दिल्यास ते चांगली टक्कर देतील, असे काँग्रेसमधीलच काहीजणांचे म्हणणे होते. त्यावर पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे.