गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा
यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्या म्हणचे महायुतीतील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या, इतकेच काय यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनीदेखील अमित शहा यांची भेट घेऊन दिल्ली दरबारी आपली हजेरी लावली. एकीकडे राज्यात जागावाटपाचा गोंधळ सुरू असताना पक्षाच्या fिशर्ष नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढणे म्हणजेच ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ असेच म्हणावे लागेल.
दोन दिवसापूर्वीच शिमगा झाला तसा महाराष्ट्रात शिमगा या शब्दाचा अर्थ कोणाच्या तरी नावाने जोरजोरात बोंब ठोकणे असा होतो, पण राज्यातील राजकीय शिमग्याला अजुन सुरूवात झालेली नाही. येत्या काही दिवसात तो सुरू होईल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने निवडणुकीची रंगत वाढत जाईल. महायुती आणि महाआघाडी या दोन्हीत अजुनही काही जागांबाबत संभ्रमावस्था असल्याचे बघायला मिळत आहे. कधी काळी भाजप-शिवसेना युती असताना भाजप आणि शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांबाबतची सर्व निर्णय प्रक्रिया या महाराष्ट्रात होत असत.
राज्यातील दोन्ही पक्षाचे नेतेच उमेदवारांची घोषणा करत असत. मात्र यावेळी एक वेगळे चित्र पहायला मिळाले ते म्हणजे भाजप नेत्यांबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेही दिल्लीला पळताना दिसले. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी देखील भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली तर दुसरीकडे सातारची लोकसभा उमेदवारी मिळावी म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले हे अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत 3 दिवस होते, म्हणजेच राज्यातील भाजपच्याच नव्हे तर महायुतीतील इतर पक्षांच्या नेत्यांना यंदा दिल्ली गाठावी लागली. त्यात एकीकडे राज्यात काही ठिकाणच्या जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही, स्थानिक पातळीवर राजकीय गोंधळ सुरू असताना पक्षाचे वरिष्ठ नेते मात्र दिल्लीत मुजरा करत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर केलेले विधान म्हणजेच माझे तिकीट राज्यातील नव्हे तर देशातील सर्वोच्च नेत्याने ठरवले यावरून एक कळते, भाजपच्या राज्यातील नेत्यांना काही अधिकार आहे का नाही?, की राज्यातील नेत्यांवर सर्वोच्च नेत्यांचा विश्वास नाही अशी शंका उपस्थित होते.
भाजपप्रणीत महायुती जी कधी काळी राज्यात शिवसेना-भाजप युती ओळखली जायची या महायुतीतील भाजपने महाराष्ट्रातील पहिल्या यादीत 20 तर दुसऱ्या यादीत 3 अशा विद्यमान खासदार असलेल्या 24 जागांपैकी 23 जागांच्या उमेदवारांची घोषणा केली. आता फक्त एका जागेवरचा उमेदवार घोषित करणे बाकी आहे. ती जागा म्हणजे कधी देशातील भाजपचे सर्वोच्च नेते राहिलेल्या दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या पुनम महाजन खासदार असलेल्या मुंबई उत्तर मध्य या जागेची. या जागेवऊन सुरूवातीला मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा असताना, या एकाच जागेची घोषणा न करणे म्हणजे या जागेवर भाजप मोठ्या धक्कातंत्राचा वापर करणार यात शंका नाही. पुनम महाजन यांना भाजप पुन्हा संधी देणार नसल्याचे जवळपास नक्की झाले आहे. मात्र येथून आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा सुरूवातीला होती, मात्र शेलार हे मराठा समाजाचे राज्यातील उभरते नेतृत्व असून ते अमित शहांच्या गुडबुकमध्ये असल्याने शेलारांना लगेच दिल्लीला पाठवणार नाही, असे दिसते.
शेलारांच्या ऐवजी याच मतदारसंघातून काँग्रेसच्या खासदार राहिलेल्या अभिनेते सुनिल दत्त यांच्या कन्या प्रिया दत्त यांचा केव्हाही भाजप प्रवेश करून त्यांना भाजप उमेदवारी देऊ शकते किंवा काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हा मतदार संघ सोडून त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ ऐनवेळी पडू शकते. बाबा सिद्दीकी यांचे फिल्मी जगताशी असणारे जवळचे संबंध त्यांच्या काही वादग्रस्त संबंधांवऊन याच भाजपने त्यांच्या विरोधात शिमगा केला होता, मात्र राजकारणात काहीही अशक्य नसते. त्यामुळे येत्या काही दिवसात सिद्दीकी हे भाजप महायुतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतील. एकीकडे भाजपने आपल्या 23 विद्यमान खासदारांची घोषणा केली, त्यात अनेकांना पुन्हा संधी दिली तर 5 ठिकाणी खांदेपालट केला.
पहिल्या टप्प्यात होत असलेल्या विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली आणि रामटेक या 5 लोकसभेच्या जागांसाठी भाजप आणि काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली. मात्र या 5 मतदारसंघातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या रामटेकच्या उमेदवाराची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. येथून शिवसेनेचे कृपाल तुमाणे हे खासदार आहेत, मात्र भाजपच्या सर्व्हेत तुमाणे यांच्याविरोधात नाराजी तसेच स्थानिक भाजप नेत्यांनी तुमाणे यांचे काम करण्यास नकार दिल्याने, सुरूवातीला भाजपनेच या मतदारसंघावर दावा केला होता.
तथापि भाजपने पहिल्याच टप्प्यातील शिवसेनेच्या वाट्याची जागा घ्यायला नको म्हणून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला. मात्र तो सोडताना तुमाणे हे उमेदवार नसणार याची काळजी घेतली. रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमरेड विधानसभेचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी आपल्या आमदारकीचा रविवारी राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. आता रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार हे राहुल पारवे असतील मंगळवारी शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर होईल तो काँग्रेसमधून आलेला असेल. 2019 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत याच उमरेड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या कृपाल तुमाणे यांना 93648 तर काँग्रेसच्या किशोर गजभिये यांना 70678 मते मिळाली होती. ती पण पारवे हे काँग्रेसमध्ये असताना यावऊन पारवे यांचा मतदारसंघातील प्रभाव लक्षात येतो आणि आता हेच पारवे लोकसभेचे शिंदेंच्या शिवसेनेचे अर्ज भरणारे पहिले उमेदवार असणार आहेत. शिवसेनेचे राज्यसभेची उमेदवारी मिळवणारे पहिले लाभार्थी हे काँग्रेसचे मिलिंद देवरा, आता लोकसभेचा पहिला उमेदवारी अर्ज भरणारे राहुल पारवे हे जर दोन दिवसापूर्वी शिवसेनेत आलेले असतील तर शिवसेनेच्या पहिल्या टप्प्यात कृपाल तुमाणे यांचा पत्ता कट झाला आता टप्प्या टप्प्याने किती जणांचा नंबर लागतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे