मुंबई-हैद्राबाद-कर्नाटकातील 12 जागांवर विजयाचा विश्वास
मंत्री एच. के. पाटील यांची माहिती : केंद्र सरकारवर निशाणा
बेळगाव : सत्य झाकून टाकण्यासाठी अनेक शक्ती प्रयत्न करीत आहेत. मात्र, ते शक्य नाही. मुंबई-कर्नाटक आणि हैद्राबाद-कर्नाटकामध्ये आपण गेल्या अनेक दिवसांपासून दौरा करत आहोत. या दौऱ्यातून स्पष्ट दिसून येत आहे की, दोन्ही भागातून 12 लोकसभा मतदारसंघांमध्ये विजय निश्चित आहे, असा विश्वास कायदा आणि प्रवासोद्योगमंत्री एच. के. पाटील यांनी व्यक्त केला. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यामध्ये राबविण्यात आलेल्या पाच गॅरंटी योजनांचा मोठा प्रभाव मतदारांवर पडला आहे. त्यामुळे राज्यांत काँग्रेसला पूरक वातावरण निर्माण झाले आहे. गॅरंटी योजनांचा थेट लाभ गोरगरिबांना करून देण्यात आला आहे. या माध्यमातून दारिद्र्यारेषेखालील 1 कोटी 10 लाखापेक्षा अधिक कुटुंबांना आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे. मोफत वीज, शक्ती योजना, तरुणांना बेरोजगार भत्ता, कुटुंबातील प्रमुख महिलेला आर्थिक मदत यामुळे हे शक्य झाले आहे. भाजपकडून या योजनांच्या अंमलबजावणीवरून आरोप करण्यात येत होते. मात्र, आता भाजपच या योजनांची नक्कल करत आहे. आरोप करणाऱ्या भाजपला आता पर्याय उरलेला नाही. त्यामुळे भाजप नेते हताश झाले आहेत. त्यामुळे तोंडाला येईल ते बोलत आहेत, असे त्यांनी सांगितले. भाजपकडून केवळ श्रीमंतांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. मोठमोठ्या कंपन्यांचे 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे, असा आरोप मंत्री एच. के. पाटील यांनी केला. यावेळी आमदार राजू सेठ, जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, अनिल पोतदार, शिवनगौडा पाटील उपस्थित होते.