For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झुआरीनगर येथे बस उलटून कंडक्टर ठार

12:40 PM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
झुआरीनगर येथे बस उलटून कंडक्टर ठार
Advertisement

25 प्रवासी जखमी, बसचालकाचा ताबा सुटल्याने घडला अपघात : प्रवाशांनी खचाखच भरलेली होती बस  ,रस्त्यावर खोदकाम करुन टाकलेला मातीचा भराव ठरला कारणीभूत

Advertisement

वास्को : भरगच्च प्रवासी भरून भरधाव वेगाने वास्कोच्या दिशेने येणारी बस उपासनगर क्वीनीनगर, झुआरीनगर येथील वळणावर उलटली. या अपघातात बसचा कंडक्टर जागीच ठार झाला तर बसमधील 25 प्रवासी जखमी झाले. काहींची प्रकृती गंभीर आहे. जखमी प्रवाशांना चिखलीतील उपजिल्हा हॉस्पिटल, कासावलीतील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच गोमेकॉमध्ये व हॉस्पिसियोमध्ये  दाखल करण्यात आले आहे. या अपघातात ठार झालेल्या बस कंडक्टरचे नाव शिवा मदार (28) असे असून तो झुआरीनगर बिर्ला येथील राहणारा होता. हा अपघात गुऊवारी संध्याकाळी चारच्या सुमारास क्वीनीनगर नाक्यावरील हॉटेल क्वीनीपासून काही अंतरावर घडला. अपघातग्रस्त बस वेर्णाहून झुआरीनगरमार्गे वास्कोच्या दिशेने जात होती. घटनास्थळावरील काही प्रवासी व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित प्रवासी वाहतूक करणारी ही मिनी बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. शिवाय बस सुसाट होती. त्यातच या महामार्गावर नुकतेच खोदकाम करुन मातीचा भराव घातलेल्या ठिकाणी बसचालकाचा बसवरील ताबा गेला आणि बस दुभाजकाला धडकून उलटली. उघड्या दारावरच उभा असलेला बसचा कंडक्टर बसखाली चिरडला गेला तर प्रवासी आतमध्येच आपटून जखमी झाले. काही प्रवासी गंभीर जखमी झाले तर काही प्रवासी किरकोळ जखमांवर बचावले. बसचा चालक सुखरूप बचावला.

अपघातस्थळी प्रवाशांच्या किंचाळ्या, चप्पलांचा खच A bus carrying a large number of passengers, coming towards Vasco at high speed, overturned at the bend in Upasnagar, Queeninagar,

Advertisement

बस उलटल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे जवळपासचे लोक मदतीसाठी धावले.  प्रवाशांना कसेबसे बाहेर काढण्यात आले. अपघातस्थळी बराच वेळ जखमी प्रवाशांच्या किंचाळ्या ऐकू येत होत्या. बसच्या काचा व प्रवाशांच्या चप्पलांचा खच पडला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक गुरूदास कदम यांच्यासह वेर्णातील पोलिस व वास्को, दाबोळी तसेच मुरगावचे पोलिस निरीक्षकही घटनास्थळी दाखल झाले. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक तसेच उत्तर गोवा पोलिस अधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. जखमींना रुग्णवाहिका व इतर वाहनांतून प्रथम चिखलीच्या उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये तसेच कांसावलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर काही गंभीर जखमींना गोमेकॉमध्ये हलवण्यात आले. तर काहींना मडगावच्या हॉस्पिसियोमध्ये हलवण्यात आले. काहींची प्रकृती गंभीर असली तरी धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. अपघातामुळे या महामार्गावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. या अपघातात सुखरूप बचावलेल्या अपघातग्रस्त बसचालकाचे नाव अकबर मेहबूब गोजी (40) असे असून तो फकीरगल्ली मांगोरहिल भागातील राहणारा आहे. त्याच्याविरुद्ध वेर्णा पोलिसांनी रात्री उशिरा या अपघात प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. वेर्णा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आमदार अँथनी वास यांनी व्यक्त केला खेद

या अपघाताची माहिती मिळताच कुठ्ठाळीचे आमदार अँथनी वास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बसमधील काही प्रवासी तसेच पोलिस व नागरिकांशी चर्चा केली. आमदार अँथनी वास यांनी या अपघाताबद्दल खेद व्यक्त करताना रस्त्यावरील वाहतूक व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बस चालकानी खबरदारीने वाहतूक करावी, असे आवाहन केले. सध्या महामार्गाचे काम चालू आहे. ते कामही पूर्ण व्हायला हवे. त्यामुळे वाहन चालकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असे स्पष्ट केले.

नागरिकांत तीव्र संताप

दरम्यान, अपघातस्थळी उपस्थित नागरिकांनी वेर्णा वास्को मार्गावरील प्रवासी वाहतुकीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. या मार्गावरील प्रवासी बस वाहतूक पूर्णपणे बेजबाबदारपणे व बेशिस्तपणे होत आहे. याचा त्रास प्रवाशांना तसेच रस्त्यावरील वाहतुकीला होत आहे. हा अपघात बसचालकाच्या मस्तीमुळेच घडलेला आहे. या बसला नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आतापर्यंत 14 वेळा तालांव मिळाल्याचे वृत्त आहे.  बसवाल्यांच्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अन्यथा असे अपघात घडतच राहतील, असे उपस्थित नागरिकांनी सांगितले.

सांकवाळच्या माजी सरपंचांनी व्यक्त केला संताप

सांकवाळचे माजी सरपंच नारायण नाईक यांनी या अपघातासंबंधी बोलताना बस व्यावसायिकांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, प्रवासी मिळवण्यासाठी या बसवाल्यांमध्ये स्पर्धा असते. बसमध्ये खच्चून प्रवासी भरलेले असतात. वेगावर नियंत्रण नसते. वागणे उद्धट असते. बसगाड्यांची अवस्था दयनीय असते. तरीही त्यांना कशाचीच पर्वा नसते. त्यामुळे अशा घटना घडणार हे निश्चितच होते. सरकारने या गंभीर समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलावीत आणि या मार्गावर बसगाड्यांची संख्या कमी असेल तर ती संख्या वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली.

Advertisement
Tags :

.