भाग्यनगर येथील ‘त्या’ गटारीचे काम त्वरित पूर्ण करा
नगरसेविकांकडून पाहणी : नागरिकांनी मांडल्या समस्या
बेळगाव : गेल्या तीन महिन्यांपूर्वी भाग्यनगर, पहिला क्रॉस येथील गटारीच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र अजूनही ते काम पूर्ण करण्यात आले नाही. अर्धवट कामामुळे त्या गटारीमध्ये पडून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांनी नगरसेविका वाणी जोशी यांना बोलावून त्याची संपूर्ण माहिती दिली. यावेळी त्यांनी हे काम तातडीने पूर्ण करू, असे आश्वासन दिले. तीन महिने झाले तरी कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करत आहे. काही दिवसांपूर्वी या गटारीमध्ये रात्रीच्यावेळी महिला पडून जखमी झाली. अंदाज येत नसल्याने अनेक जण या गटारीमध्ये पडत आहेत. तेव्हा तातडीने याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नगरसेविका वाणी जोशी यांनी यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करू आणि अर्धवट काम पूर्ण करू, असे आश्वासन दिले. यावेळी वसंत दांडेकर, अरुण दळवी, मनोहर भांदुर्गे, संदीप पाटील, अरविंद नागनुरी यांनी समस्या मांडल्या.