शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या
सरकारच्या विरोधात निषेध : शेतकऱ्यांचे येडियुराप्पा मार्गावर ठिय्या आंदोलन
बेळगाव : कृषी कायदे मागे घ्यावेत, विद्युत कायदा मागे घ्यावा, उसाला एफआरपीसह एसएपी द्यावे, राज्यातील उसाला एक साखर कारखान्याला एक रिकव्हरी तर दुसऱ्या साखर कारखान्याला एक अशी फसवणूक थांबवावी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने मदतकार्य हाती घ्यावे, म्हादई आणि मेकेदाटू योजना जारी कराव्यात, सरसकट कृषीकर्ज माफ करावे, पंतप्रधान फसल विमा योजना वितरित करावी आदी मागण्यांसाठी कर्नाटक राज्य संघ आणि हसिरू सेना यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांनी येडियुराप्पा मार्गावरच ठिय्या आंदोलन छेडले. पोलिसांनी धरपकड करून आंदोलनकर्त्यांना आंदोलनस्थळी सोडून दिले. शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करून निषेध नोंदविला. राज्यात दुष्काळी परिस्थिती असूनदेखील शासनाकडून कोणत्याच उपाययोजना हाती घेतल्या जात नाहीत. शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय पीकविमा मिळवून देण्याच्या दिशेने कोणतीच कार्यवाही होत नाही. पीक संरक्षणासाठी कोणत्याच उपाययोजना राबविल्या जात नाहीत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत, असा आरोपदेखील शेतकऱ्यांनी आंदोलनादरम्यान केला आहे.
सुविधा देण्यात सरकार अपयशी
राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. ही निषेधार्ह बाब आहे. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांना सोयीसुविधा देण्यात अपयशी ठरले आहे. राज्यात तीव्र दुष्काळ असतानादेखील सरकारकडून कोणत्याच उपाययोजना हाती घेतल्या जात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.