येत्या आर्थिक वर्षात सर्व ग्राम पंचायतींना समान निधी
निधी वाटपाबाबत प्रणाली तयार करणार
पणजी : सर्व ग्राम पंचायतींना सरकारी निधीचा समान वाटा मिळावा यासाठी गोवा सरकार पुढील आर्थिक वर्षाच्या आधी एक प्रणाली तयार करणार आहे. या प्रणालीनुसार, येत्या आर्थिक वर्षांत राज्यातील सर्व पंचायतींना सरकारी निधीचा समान वाटा देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. पणजी येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ज्या पंचायतींनी 14 व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेल्या निधीचे वापर प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांना 15 व्या वित्त आयोगांतर्गत जारी केलेला निधी मिळाला नाही. ज्या पंचायतींना आधीच्या आर्थिक वर्षात कमी निधी मिळाला आहे, त्यांना प्राधान्याने निधी वाटप करण्याचा प्रयत्न केला जाईल. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर यांनी सांगितले की, 191 पंचायतींपैकी 92 पंचायतींनी eGramSwaraj (https://egramswaraj.gov.in/) या पोर्टलवर केंद्राच्या 9 प्रमुख योजनांच्या तुलनेत विकास आराखडा अपलोड केला आहे. योजना पोर्टलवर मॅप कराव्या लागतात. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत पंचायतींना केंद्र पुरस्कृत योजनांची कामे करून संबंधित निधी खर्च करता येणार नाही.