रेल्वेस्थानके नूतनीकरण प्रकल्पाचा प्रारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 41 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची कोनशीला स्थापन
वृत्तसंसथा / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील 553 रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण यांच्या भव्य प्रकल्पाची कोनशीला स्थापन करण्यात आली आहे. हा प्रकल्प 41 हजार कोटी रुपयांचा आहे. त्याअंतर्गत 1,500 उ•ाणसेतू आणि भुयारी मार्गांचेही नूतनीकरण केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे पायाभूत सुविधांचा कायापालट होणार आहे. भारत आता भव्य स्वप्ने पहात असून त्याने छोट्या स्वप्नांवर समाधान मानण्याची सवय त्याने सोडून दिली आहे, असे उद्गार याप्रसंगी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत.
गेल्या दहा वर्षांमध्ये देशात एक नवी कार्यसंस्कृती रुजली आहे. भव्य प्रकल्प हाती घेणे आणि ते झपाटून काम करुन वेळेवर पूर्ण करणे, हा आता भारतीयांचा कार्यक्रम बनला आहे. भव्य प्रकल्प आणि वेगवान काम ही आता भारताची ओळख झाली आहे. भारताची ही नवी ओळख रेल्वे आणि पायाभूत सुविधा कार्यांच्या माध्यमातून आता स्पष्टपणे जगासमोर येत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या हस्ते कोनशीला स्थापन झालेली ही योजना ‘अमृत भारत स्थानक योजना’ या नावाने ओळखली जात आहे. या योजनेच्या अंतर्गत ज्या प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे, त्यांचे उद्घाटनही सोमवारी त्यांनी ऑनलाईन केले.
काय आहे योजना
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत 553 रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण केले जात आहे. रेल्वे स्थानकांकडे जाण्या-येण्यासाठी सुलभ मार्ग, अधिक प्रशस्त प्रतीक्षा कक्ष (वेटींग रुम्स) चांगल्या स्वच्छता सुविधा, लिफ्ट आणि सरकत्या जिन्यांची सुविधा, विनामूल्य वायफाय सुविधा, स्थानिक उत्पादनांच्या खरेदीची सुविधा, औद्योगिक बैठकांसाठी कक्ष, रेल्वेस्थानकांपासून अन्य महत्त्वाच्या स्थानी जाण्यासाठी वाहनांची सोय, एक्झिक्युटिव्ह लाऊंजेस, प्रवाशांना बसण्यासाठी प्रशस्त जागा, स्वच्छ पिण्याचे पाणी, पॅकबंद अन्नपदार्थ, स्थानिक अन्नपदार्थ, हवेशीर दालने, सामान ठेवण्यासाठी अधिक सुरक्षित जागा, अत्याधुनिक माहिती कक्ष आदी सुविधा मिळणार आहेत.
उड्डाण आणि भुयारी मार्ग
या प्रकल्पाच्या अंतर्गत रेल्वे स्थानकांकडे येण्यासाठी आणि तेथून जाण्यासाठी उ•ाण मार्ग आणि भुयारी मार्गांचेही नूतनीकरण आणि रुंदीकरण केले जाणार आहे. रेल्वे स्थानकावर किती गर्दी असते याचा विचार करुन हे मार्ग त्यानुसार रुंद केले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना गोंधळ, चेंगराचेंगरी आदी समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. दुर्घटना साहाय्यता यंत्रणाही अद्ययावत केली जाणार आहे. आवश्यक त्या स्थानी नवे रेल्वे उ•ाण सेतू किंवा भुयारी मार्ग निर्माण केले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना सुखानुभूती मिळेल अशी अपेक्षा आहे.
आंध्र प्रदेश, ओडीशावर भर
या योजनेत ओडीशाच्या निवडक 21 रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशच्याही 22 स्थानकांचा कायापालट केला जाईल. ओडीशासाठी 660 कोटी रुपये, तर आंध्र प्रदेशसाठी 700 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, पंजाब, तामिळनाडू इत्यादी राज्यांमधील रेल्वे स्थानकांचेही रुप पालटविण्याचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली.
रेल्वेचा कायापालट करण्याची क्षमता
गेल्या 10 वर्षांमध्ये रेल्वे सुधारण्यासाठी केंद्र सरकारने बरेच प्रयत्न केले आहेत. प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रगती साध्य करण्यात आली आहे. रेल्वेचे वेळापत्रकही आता पुष्कळसे सुधारले असून रेल्वे सेवेत तत्परता आलेली आहे. अमृत भारत स्थानक योजनेमध्ये रेल्वे सुविधांचा कायापालट करण्याची क्षमता आहे. रेल्वेचा चहुमुखी विकास करण्याच्या हेतूने भविष्यकाळात आणखी नवे उपक्रम हाती घेण्यात येतील. त्यांना आधुनिकतेची जोड देऊन ते वेळेवर पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती या निमित्ताने रेल्वेकडून देण्यात आली आहे.