For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी खुर्द प्रवेशद्वारातील रस्त्याकडे साफ दुर्लक्ष

10:26 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी खुर्द प्रवेशद्वारातील रस्त्याकडे साफ दुर्लक्ष
Advertisement

गेल्या पाच-सहा वर्षांपासून अधिकाऱ्यांचा कानाडोळा : नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय 

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

कंग्राळी खुर्द गावच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या सभोवतालच्या रस्त्याची चाळण झाली आहे. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती करण्यासंदर्भात संबंधित शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना कळवूनसुद्धा रस्त्याचे काम झालेच नाही. तेव्हा हे काम होणार तरी कधी, अन्यथा नागरिकांनाच आता रस्त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व प्रवासीवर्गातून व्यक्त होताना दिसत आहेत.रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असल्यामुळे मूर्ती परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे.

Advertisement

पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी भरत असते. त्यामुळे वाहने जाताना बसस्टॉपवर उभे असलेल्या विद्यार्थ्यांसह प्रवासी वर्गाच्या अंगावर पाणी उडून कपडे खराब होत आहेत. त्यामुळे वादावादीचे प्रसंग घडत आहेत. दुचाकी घसरून दररोज 3 ते 4 अपघात होत आहेत. पाच वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी कामाच्यावेळी या ठिकाणी सुशोभिकरण करून रस्त्याचे काम केले जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर निवडणूक काळातही काम करण्याची ठोस आश्वासने दिली होती. पण सर्व आश्वासने हवेत विरली आहेत. दोन महिन्यापूर्वी ओढ्याचे काम 15 व्या वित्त आयोग फंडातून झाले. परंतु रस्त्याचे काम न झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

पुढील 20 ते 25 गावांचा संपर्क

रस्त्यावरुन पुढील 20 ते 25 गावचे नागरिक ये-जा करत असतात. पहाटे 5.30 पासून रात्री 12 पर्यंत वर्दळ असते. रात्रीच्या वेळेला अंधारामुळे खड्डे दिसत नसल्यामुळे दुचाकीस्वार घसरुन पडून जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यावरच शासनाचे डोळे उघडणार की काय, अशीही प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होताना दिसत आहेत. संबंधितांनी त्वरित रस्त्याची दुरुस्ती करून वाहनधारक व प्रवासी वर्गाला दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

...तर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करू

गेली 5-6 वर्षे रस्ता दुरुस्तीची सतत मागणी होत आहे. परंतु रस्त्याचे काम होत नाही. कोणत्या कारणामुळे या कामात दिरंगाई होत आहे. हेच कळत नाही. रस्त्याचे काम त्वरित झाले नाही तर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

- प्रशांत पाटील, ग्राम. पं. सदस्य

Advertisement
Tags :

.