जीवनातील यशप्राप्तीसाठी आवडते क्षेत्र निवडा : डॉ. उद्धव भोसले
‘तरुण भारत’गोवा आणि संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम
पणजी : आज उच्च शिक्षणासाठी जाताना विविध क्षेत्र उपलब्ध आहे. शैक्षणिक क्षेत्रात मूलभूत बदल झाले असून, जीवनातील ध्येय गाठण्यासाठी आणि यशप्राप्तीसाठी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडणे अत्यंत गरजेचे आहे. आवडीचे क्षेत्र निवडले तर माणसाची प्रगती आणि समाधान निश्चित स्वरूपात होते, असे प्रतिपादन संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.उद्धव भोसले यांनी केले. ‘तरूण भारत’ गोवा आणि संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित ‘बारावी व पदवीनंतर करिअरमधील संधी, महत्त्व आणि आव्हाने’ या विषयावर करिअर मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून संजय घोडावत विद्यापीठाचे अॅडमिशन आणि मार्केटिंग संचालक राजेश वशीकर, दै. ‘तऊण भारत’ गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, तज्ञ वत्ते डॉ. स्वप्नील हिरीकुडे, डॉ. व्ही.व्ही. कुलकर्णी व ‘तऊण भारत’ गोवाचे जनरल मॅनेजर सचिन पोवार, अनिल शेलार उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. डॉ.उद्धव भोसले म्हणाले की, आज सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात बदल घडत आहे. त्याचप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या बदलांमुळे शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. शिक्षण पद्धती बदलत चालल्या आहे. ‘मल्टी डिसिप्लिनरी’ संकल्पना म्हणजेच एक क्षेत्र निवडून विविध विषयांचे ज्ञान मुलांना मिळत आहे. अशा प्रकारचे शिक्षण काळाची गरज देखील आहे. त्यामुळे बदलत्या युगात आवडीनुसार क्षेत्र निवडणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण फक्त नोकरीसाठी नाही तर चांगला माणूस घडविण्यासाठी आणि माणसाचा विकास होण्यासाठी आहे, असे प्रा. भोसले यांनी नमूद केले आहे.
पालकांनी मुलांची क्षमता, कुवत आणि इच्छांचा विचार करावा
मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. अनेक वेळा पालक आपल्याला हवे ते क्षेत्र निवडण्यास मुलांना भाग पाडतात. परंतु, मुलांची क्षमता, कुवत आणि इच्छा यांचा विचार पालकांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मुलं जे क्षेत्र निवडतील त्यात त्यांना समाधान मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक आणि शैक्षणिक आयुष्यात समतोल येईल. याचप्रमाणे जीवनात बदल, सकारात्मक दृष्टिकोन, नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द, मेहनत, कष्ट,अपयशाशी सामोरे जाण्याची ताकत या गोष्टी मुलांमध्ये असल्या तरच त्यांचे अस्तित्व कायम राहील, असे प्रा.भोसले म्हणाले.
दिशा ठरविली तर यश निश्चितच मिळणार : सागर जावडेकर
गोव्यामध्ये शिक्षण क्षेत्रात अनेक सुविधा उपलब्ध आहे.त्यामुळे बारावी किंवा पदवीनंतर नेमके काय करावे असा प्रश्न बहुतेक वेळा विद्यार्थी आणि पालकांना पडतो. यावेळी पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते. आज अनेक विद्यार्थी स्वत:चे अस्तित्व शोधताना दिसत नाही. आजच्या आधुनिक युगात पुस्तकी आणि शालेय ज्ञानासोबत चौफेर ज्ञान आवश्यक आहे. नेमके आपले छंद काय आहेत हे शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचबरोबर मोठी स्वप्ने आजच्या मुलांनी बघणे गरजेचे आहे. कुठलीही गोष्ट साध्य करण्याची योग्य दिशा ठरविली तर यश निश्चितच प्राप्त होते. असे सागर जावडेकर म्हणाले.
‘डिझाईन’ क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधीवर डॉ. व्ही.व्ही. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन
आधुनिक काळात डिझाईन क्षेत्राचे महत्व आणि व्याप्ती वाढत चालली आहे.आधुनिक काळात मॉडर्न डिझाईन यांना वेगळे महत्व प्राप्त होत चालले आहे. या क्षेत्रात आज विविध संधी उपलब्ध आहे. परंतु या विषयीचे ज्ञान, योग्य मार्गदर्शन आज युवकांना प्राप्त होत नाही. त्यामुळे या क्षेत्राकडे जास्तशे युवक जाताना दिसत नाही. आवड, क्षमता बघूनच क्षेत्र निवडणे गरजेचे आहे. याचबरोबर आत्मविश्वास, वेळेचे व्यवस्थापन, योग्य निर्णय या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहे. आज प्रत्येक गोष्टीचा डिझाईन, आकार, संकल्पना नव्या रूपाने आपल्या समोर येत आहे. त्यामुळे या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या युवकांना भविष्यात वाव आहे, असे डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी म्हणाले.
चिकाटी महत्वाची, ध्येय सोडू नका : डॉ. स्वप्नील हिरीकुडे
करिअर निवडताना तो आवडीचा निवडणे गरजेचे आहे कारण त्यावर पुढील आयुष्य अवलंबून असते. त्यामुळे आयुष्यातील ध्येय निश्चित केले तर ते सोडता कामा नये. यासाठी आयुष्यात चिकाटी महत्वाची असते. याचबरोबर ईच्छाशक्ती, आपल्यात नेमकी कुठली कमतरता आहे, उपलब्ध संधी आणि आव्हाने या चार गोष्टीची जाण असणे अत्यंत महत्वाचे आहे. असे तज्ञ वत्ते डॉ. स्वप्नील हिरीकुडे यांनी नमूद केले आहे. तसेच त्यांनी करिअर निवडताना उपलब्ध असलेल्या संधी आणि त्यांचे फायदे यावर भाष्य केले.