शहरातून बालकामगार निषेधफेरी
विविध प्रशासकीय विभागांच्यावतीने आयोजन
बेळगाव : जिल्हा कायदा सेवा प्राधिकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा महिला व बाल कल्याण खाते आणि कामगार विभागाच्यावतीने शहरातून बालकामगार निषेध फेरी काढण्यात आली. या फेरीचे उद्घाटन जिल्हा कायदा सेवा प्राधिकारचे सचिव मुरली मनोहर रेड्डी , पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या हस्ते करण्यात आले. बालकामगार कोणत्याही उद्योग-व्यवसायासाठी घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. 14 वर्षांखालील मुलांना किराणा दुकान, हॉटेल्स, रेस्टॉरंट तसेच घरकामासाठी व उद्योग क्षेत्रात कामाला घेतल्यास संबंधित मालकावर गुन्हा दाखल केला जातो. 1986 च्या बालकामगार कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली असून 2016 च्या कायद्यानुसार बालकामगार आपल्याकडे ठेवून घेणाऱ्या व्यक्तीला 6 महिने ते 2 वर्षापर्यंत शिक्षा आहे. याचबरोबर 20 ते 50 हजार रुपयांपर्यंत दंडदेखील आकारला जातो. तेव्हा बालकामगार कोणीही ठेवून घेऊ नये, असे आवाहन मुरली मनोहर रेड्डी यांनी केले आहे. 15 ते 18 किशोरवयीन कामगारांना धोकादायक व अवजड कामे लावू नयेत. महत्त्वाचे म्हणजे पालकांवरही या प्रकरणी गुन्हा दाखल केला जातो. तेव्हा पालकांनीही गांभीर्याने याची दखल घ्यावी, असे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, यासाठी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 देखील पूर्वीपासूनच सुरू करण्यात आला आहे.