मुख्यमंत्री सावंत यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांचे अनुकरण करावे
विजय सरदेसाई यांनी व्यक्त केलेली अपेक्षा
मडगाव : गोव्याचे मुख्यमंत्री आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचे अनुकरण करतील की, सामान्य लोकांवर वीज दरवाढीचा बोजा टाकत राहतील, असा सवाल गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. भाजपच्याच मुख्यमंत्र्यांनी जनतेवरील आर्थिक बोजा कमी करण्याचा उत्तम आदर्श घालून दिला आहे. मला डॉ. प्रमोद सावंत यांनीही असेच करावे अशी अपेक्षा आहे. त्यांच्या वीजमंत्री आणि खात्याने विजेचे दर वाढवण्याच्या बाबतीत जो उत्साह दाखवला आहे तसाच उत्साह लोकांच्या खर्चावर त्यांना मिळणारा किमान एक विशेषाधिकार सोडून देण्याच्या बाबतीतही दाखवावा अशी मला अपेक्षा आहे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. वीज खात्यासाठी 3990 कोटी रु. आधीच दिलेले असताना भाजपचे गोवा सरकार दरवाढीसाठी का दबाव टाकत आहे, तेही भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री या वीज दरवाढीला विरोध करत असताना, असा सवाल त्यांनी केला आहे. आता तरी सरकारला वास्तव समजणार काय, असे आमदार सरदेसाई यांनी म्हटले आहे.