आळंद मतदारसंघातील मतचोरी प्रकरणी आरोपपत्र दाखल
22 हजार पानी आरोपपत्रात माजी आमदारासह 7 जणांच्या नामोल्लेख
प्रतिनिधी/ बेंगळूर
कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद विधानसभा मतदारसंघातील कथित मतचोरी प्रकरण एसआयटीने बेंगळूरमधील एसीएमएम न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे 22 हजार पानी आरोपपत्रात भाजपचे माजी आमदार सुभाष गुत्तेदार, त्यांचे पुत्र हर्षानंदसह एकूण 7 जणांचा उल्लेख करण्यात आल्याचे समजते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उत आला आहे.
2023 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आळंद मतदारसंघात मतचोरी झाल्याचा आरोप करण्यात आला होता. राज्य सरकारच्या आदेशावरून सीआयडीचे एडीजीपी बी. के. सिंग यांच्या नेतृत्वातील विशेष तपास पथकाने (एसआयटी) या प्रकरणाचा एसआयटी तपास केला आहे. तपास पूर्ण झाल्याने शुक्रवारी बेंगळूरच्या एसीएमएम न्यायालयात 22 हजार पाणी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
आळंद मतदारसंघात 2023 च्या निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप याच मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार बी. आर. पाटील यांनी केला होता. या प्रकरणी स्थानिक पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली होती. हाच मुद्दा लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनी प्रचारावेळी उपस्थित केला होता.
एसआयटीला तपासावेळी
आळंद मतदारसंघात 5,994 मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली होती, असे आढळून आले. मतदारांची नावे वगळण्यासाठी सायबर सेंटरचा वापर करून पैसे देण्यात आले होते. एका मतदाराचे नाव वगळण्यासाठी 80 रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे. डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत 6,018 मतदारांची नावे रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यात आल्याचा आरोपही आहे. माजी आमदार सुभाष गुत्तेदार यांनी मतचोरीसाठी पैसे देवविल्याचा आरोप आहे, असे सूत्रांकडून समजते.
आरोपपत्रात कोणकोणते मुद्दे आहेत, याविषयी आम्हाला अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. नोटीस बजावून आमचे जबाबत घेण्यात आले आहेत. या प्रकरणात आमची कोणतीही भूमिका नाही, असे आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार सुभाष गुत्तेदार यांचे पुत्र हर्षानंद यांनी दिली आहे. मतचोरीचा आरोप करणाऱ्यांचेच सरकार असल्याने ते अधिकाऱ्यांचा वापर करून माझे आणि माझ्या वडिलांचे नावे आरोपपत्र समाविष्ट करण्यात आली आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.