For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चराति चरतो भग:...

06:05 AM Dec 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
चराति चरतो भग
Advertisement

मध्यंतरी एका डोळ्याच्या डॉक्टरकडे गेले तेव्हा डॉक्टरांनी गवतावर चाला, असं सांगितलं. गुडघे दुखतात म्हणून दुसऱ्या डॉक्टरकडे गेले तर त्यांनी... पाण्यात चाला असं सांगितलं. दुखणी वेगवेगळी पण सगळ्यांवर उपाय मात्र चालण्याचाच. म्हणतात ना ‘चालणाऱ्याचे भाग्य चालते’ त्याचीच ही परिणीती. प्राचीन काळी अक्षपाद नावाचे एक ऋषी होऊन गेले. ज्यांच्या पायाला डोळे होते, असं म्हटलं जायचं. पण याचा खरा अर्थ त्यांची चालल्यामुळे दृष्टी उत्तम होती, असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. कारण चालणारा माणूस जास्त अनुभव समृद्ध ठरतो. पूर्वी पायी चालत जाण्याचा प्रघात होता. हल्ली आम्ही कारमधून जातो. चालणाऱ्याला दिसणारा निसर्ग किंवा टोचणारे काटे, मिळणारे सुगंध, स्पर्श, सावली, ह्याचे अनुभव कारमधल्या माणसाला नसतातच. वेगामुळे या सगळ्या जगण्याची अनुभूती आम्ही सगळेजण घालवून बसलोय. सतत आभासी जगात वावरणाऱ्यांना चालण्याचा मंत्र द्यायला हवा, नाहीतर विज्ञानाने प्रगत केले म्हणणे चुकीचे ठरेल. विज्ञान जर पायातले बळच काढून घेणार असेल तर अशा विज्ञानाचा काय उपयोग? कारण जसजसा माणूस प्रगत झाला तस तसं त्यांनं जगण्याची उभारी वाढवायला सुरुवात केली. कधी बैलाच्या पाठीवर बसून तर कधी उंट, घोड्यावर बसून तो प्रवास करू लागला. त्यानंतर सायकल, स्कूटर, मोटार, विमान, आगगाडी या सगळ्यांच्या चाकावरून सगळ्या जगभरात फिरायला लागला. काय बघायचे? हे नेमकं माहिती नसल्यामुळे, काय खायचे? आणि काय खरेदी करायचे? याचीच चर्चा जास्त व्हायला लागली. बोटावर मोजता येतील एवढीच माणसं ट्रेकिंगला जातात, डोंगरदऱ्या धुंडाळतात. परदेशातली भूमी पिंजून काढतात. नर्मदेची परिक्रमा करतात. अशा लोकांचे चरण स्पर्श महत्त्वाचे ठरतात. त्यांच्या डोळ्यांनी वाचलेले क्षण मातीची अनुभूती सगळा प्रदेशच आपल्या डोळ्यासमोर उभा करते. म्हणून तर वारकरीदेखील पटकन म्हणतात ‘पाऊले चालती पंढरीची वाट’. पाऊल चालल्यामुळेच त्यांना त्या परब्रम्हाचे दर्शन घडणार असते. त्यांची चालण्याची उत्कंठा आम्हालाही प्रेरणा देऊन जाते. चालणारी माणसं डोळ्याला स्वप्न दाखवतात आणि डोळ्यांची स्वप्न आपले पाय पूर्ण करतात. खरंतर कोण कसं चालतं, असा विचार केला तर लक्षात येतं जगात जन्माला आलेले सगळे सजीव व निर्जीव वेगवेगळ्या पद्धतीने सतत चालतच असतात. एका लयीत वाढत असतात. चालणं म्हणजे गतिमान होणं, यात पर्वत, झाडं, नदी, समुद्र सगळ्यांचा समावेश होतो.

Advertisement

पूर्वार्ध

Advertisement

Advertisement
Tags :

.