For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चरैदेव मैदम’ला युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळाचा दर्जा

06:35 AM Jul 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
चरैदेव मैदम’ला युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळाचा दर्जा
Advertisement

आसामचे ‘पिरॅमिड’अशी ओळख : आसाम सरकारकडून आनंद व्यक्त

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसाममधील राजघराण्यांच्या अंत्यभूमीला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत सामील करण्यात आले आहे. भारतासाठी ही मोठी कामगिरी असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. जागतिक वारसा समितीने चरैदेव मैदमला भारताच्या 43 व्या जागतिक वारसास्थळाच्या स्वरुपात सामील करण्याची घोषणा शुक्रवारी केली आहे.

Advertisement

हा भारतासाठी शुभ दिन आहे. पहिल्यांदाच भारतात जागतिक वारसा समितीची बैठक आयोजित होत असून भारत त्याचे अध्यक्षत्व करत आहे. याचे आयोजन आव्हानात्मक होते, परंतु भारतात जी-20 च्या यशस्वी आयोजनामुळे देशाची पायाभूत सुविधा अत्यंत मजबूत झाल्याने आत्मविश्वास वाढला आहे. आता भारतात जागतिक स्तराचे मोठे आयोजन केले जाऊ शकते असा विश्वास आहे. जागतिक वारसा समितीच्या बैठकीत 165 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले असल्याचे केंद्रीय संस्कृती आणि पर्यटनमंत्री गजेंद्र शेखावत यांनी म्हटले आहे.

तीन वर्षांपूर्वी आसामच्या अहोम राजांची अंत्यभूमी चरैदेव मैदमची शिफारस करण्यात आली होती. यानंतरच जागतिक वारसास्थळांच्या यादीत चरैदेव मैदमचा समावेश करण्यात आला आहे. 43 पैकी 13 स्थळांना मागील 10 वर्षांमध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाले असल्याचे शेखावत म्हणाले.

चरैदेव मैदम काय आहे?

चरैदेव मैदमला अहोम समुदायाकडून पवित्र मानले जाते. प्रत्येक मैदम एक अहोम शासक किंवा नामांकित व्यक्तीचे विश्रामस्थळ मानले जाते. येथे त्यांच्या अवशेषांसोबत मूल्यवान कलाकृती आणि खजिना संरक्षित आहे. मृत अवशेषांना एका भूमिगत कक्षात दफन केले जातात, त्यावर टेकडी किंवा स्मारकाची निर्मिती केली जाते. मैदम आसामी ओळख आणि वारशाच्या समृद्ध परंपरेला दर्शवितो.  येथे 90 हून अधिक टेकड्यासदृश मोईदम आहेत. या टेकड्या म्हणजे केवळ दफनभूमी नसून विशेष सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. शिवसागर शहरापासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर वसलेले चरैदेव मैदम ‘आसामचे पिरॅमिड’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. चरैदेव ही अहोरम राज्याची राजधानी होते. अहोम राजघराण्याचे आसाममध्ये सुमारे 600 वर्षांपर्यंत राज्य होते.

मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त

चरैदेव मैदम आता अधिकृत स्वरुपात युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ ठरल्याने आम्ही आंनदी झालो आहोत. आसाम या सन्मानासाठी नेहमीच केंद्राचा ऋणी राहणार आहे. हा निर्णय केवळ आसाम नव्हे तर पूर्ण देशासाठी सन्मानाचा विषय आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते, कारण त्यांनी चरैदेव मैदमला जागतिक वारसास्थळांच्या यादीत सामील करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत असे उद्गार मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :

.