मणिपूरमध्ये निवडणूक आयोगासमोर आव्हान
58 हजार विस्थापितांमधून मतदार शोधणे अवघड : 17 दिवसांनी होणार मतदान
वृत्तसंस्था/ इंफाळ
मागील वर्षी 3 मेपासून हिंसेमुळे तणावाला सामोरे जाणाऱ्या मणिपूरमध्ये 19 आणि 26 एप्रिल रोजी दोन टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. राज्यात इनर आणि आउटर मणिपूर असे दोन मतदारसंघ आहेत. राज्यात 20,29,601 मतदार आहेत. परंतु तेथे स्थापन 349 शिबिरांमध्ये राहत असलेल्या 58 हजार विस्थापितांमध्ये किती मतदार आहेत याचा आकडा सध्या निवडणूक आयोगाकडे नाही. मतदानाला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने हजारो विस्थापित त्रस्त होत आहेत.
हिंसेमुळे ज्यांना स्वत:चे घर सोडावे लागले, यापैकी अनेकांचे दस्तऐवज जाळपोळीमुळे नष्ट झाले आहेत. मागील 3 महिन्यांमध्ये अनेक लोकांनी प्रशासनाच्या मदतीने मतदार ओळखपत्र पुन्हा मिळविले आहे, परंतु अद्याप हजारो जणांकडे मतदार ओळखपत्र नाही.
या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आयोगाने 27 मार्च रोजी एक नोटीस जारी करत विस्थापितांना संबंधित शिबिराच्या नोडल अधिकाऱ्याकडून ओळखपत्र अर्ज घेत तो भरून जमा करण्याचे आवाहन केले आहे. हा अर्ज भरल्यावर संबंधितांना मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. याचबरोबर यामुळे शिबिरात राहत असलेल्या मतदारांची संख्याही समजू शकणार आहे. विस्थापितांच्या समस्येबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रक्रिया राबविली जात असल्याचे सांगितले आहे.
65 हजारांहून अधिक जणांचे स्थलांतर
मणिपूरमध्ये आतापर्यंत 65 हजारांहून अधिक जणांनी स्थलांतर केले आहे. राज्यात 6 हजार गुन्हे नोंद झाले असून 144 जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यात 36 हजार जवान आणि 40 आयपीएस तैनात करण्यात आले आहेत. पर्वतीय आणि खोरे क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये एकूण 129 पोलीस स्थानकांची स्थापना करण्यात आली आहे. इंफाळ खोरे हे मैतेईबहुल असल्याने तेथे राहणारे कुकी लोक आसपासच्या पर्वतीय भागांमध्ये स्थापन शिबिरांमध्ये राहत आहेत. तेथे त्यांच्या समुदायाचे लोक बहुसंख्याक आहेत. तर पर्वतीय भागांमधील मैतेईल लोक स्वत:चे घर सोडून इंफाळ खोऱ्यात स्थापन शिबिरामंध्ये राहत आहेत.
मैतेई अन् कुकी यांच्यातील वाद
मणिपूरची लोकसंख सुमारे 38 लाख असून येथे मैतेई, नागा आणि कुकी हे मुख्य तीन समुदाय आहेत. मैतेई हे प्रामुख्याने हिंदू आहेत, तर नागा-कुकी हे ख्रिश्चन धर्म मानतात आणि त्यांचा अनुसूचित जमातीत समावेश होतो. राज्याच्या सुमारे 10 टक्के भागात फैलावलेले इंफाळ खोरे मैतेई समुदाय बहुल आहे. नागा-कुकी समुदायाची लोकसंख्या सुमारे 34 टक्के आहे. परंतु हे लोक राज्याच्या सुमारे 90 टक्के भागात राहतात. मैतेई समुदायाने अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची मागणी करत याकरता मणिपूरच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 1949 मध्ये मणिपूरचे भारतात विलीनीकरण झाले होते, त्यापूर्वी मैतेई समुदायाला आदिवासीचा दर्जा प्राप्त होता असा दावा याचिकेत करण्यात आला होता. यानंतर उच्च न्यायालयाने मैतेई समुदायाल अनुसुचित जमातीचा दर्जा देण्याची शिफारस केली होती. यामुळे राज्यात मैतेई आणि कुकी समुदायादरम्यान हिंसा झाली, या हिंसेत अनेकांचा बळी गेला आहे.