आयसीयूत भरती करण्यासंबंधी केंद्राचे दिशानिर्देश
रुग्ण किंवा कुटुंबाची सहमती आवश्यक : 24 डॉक्टरांच्या टीमकडून शिफारस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने गंभीर रुग्णांना आयसीयूत भरती करण्यासंबंधी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय यांच्या सहमतीशिवाय रुग्णालय रुग्णाला आयसीयूमध्ये भरती करू शकणार नाही. याचबरोबर जर एखाद्या रुग्णावर उपचार होत नसतील, प्रकृतीत सुधारणा होत नसेल तर रुग्णालय जाणूनबुजून त्याला आयसीयूमध्ये ठेवू शकणार नाही.
आरोग्य मंत्रालयाने 24 डॉक्टरांच्या टीमने केलेल्या शिफारसींच्या आधारावर हे दिशानिर्देश जारी केले आहेत. या तज्ञांनुसार महामारी किंवा आपत्तीच्या स्थितीत जेथे साधने मर्यादित असतील तेथे गरजू रुग्णांना प्राथमिकता दिली जावी.
आयसीयूमध्ये ‘यांना’ भरती करा
दिशानिर्देशानुसार जर एखाद्या रुग्णाला हेमोडायनामिक इनस्टेबिलिटी, ऑक्सिजन सपोर्टची गरज असेल, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, मेजर हार्ट अटॅक आला असल्यास, कार्डियक अरेस्ट झाल्यास, रक्ताची उलटी होत असल्यास, ऑर्गन सपोर्टची गरज भासल्यास, वैद्यकीय स्थिती किंवा आजार गंभीर होण्याची शक्यता असल्यास आयसीयूमध्ये दाखल केले जाऊ शकते. याचबरोबर बेशुद्धावस्थेत कृत्रिम श्वासोच्छश्वासाची गरज भासल्यास, गंभीर आजाराच्या स्थितीत इंटेंसिव्ह मॉनिटरिंगची गरज भासल्यास, शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडण्याची भीती असल्यास, मेजर इंट्राऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन्सला रुग्ण सामोरा जात असल्यास त्याला आयसीयूत दाखल केले जाऊ शकते.
आयसीयूत मिळणाऱ्या सुविधा
रुग्णालयातील आयसीयू बेडमध्ये रक्तदाब, पल्स रेट, रिस्पायरेटरी रेट, ब्रीथिंग पॅटर्न, हार्ट रेट, ऑक्सिजन सॅच्युरेशन, यूरिन आउटपूट आणि न्यूरोलॉजिकल स्टेट्स समेत अन्य पॅरामीटरची तपासणी व्हावी असे दिशानिर्देशात नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर रुग्णाची स्थिती सामान्य झाल्यास किंवा बेसलाइन स्टेटसच्या जवळपास आल्यास रुग्णालयाने त्याला आयसीयूत डिस्चार्ज द्यावा असे दिशानिर्देशात म्हटले गेले आहे.
गरजूंना मिळावी सुविधा
आयसीयू एक मर्यादित स्रोत आहे. दिशानिर्देश निर्माण करण्याचा उद्देश सर्वाधिक गरज असलेल्या लोकांना आयसीयूची सुविधा मिळावी असल्याचे तज्ञांच्या टीममध्ये सामील डॉक्टर आर.के. मणि यांनी सांगितले आहे. हा केवळ सल्ला असून बंधन नाही. आयसीयूत प्रवेश आणि डिस्चार्जचा निकष रुग्णाच्या स्थितीवर निर्भर असून उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या विवेकबुद्धीवर हा निर्णय बऱ्याचअंशी सोडण्यात आल्याचे इंडियन कॉलेज ऑफ क्रिटिकल केयर मेडिसीनचे सचिव डॉ. सुमित रे यांनी म्हटले आहे.
आर्थिक स्थिती येते आड
भारतात सुमारे 1 लाख आयसीयू बेड्स आहेत, यातील बहुतांश खासगी रुग्णालयांमध्ये आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ न शकणाऱ्या गरीब लोकांना आयसीयू बेड सहजपणे मिळत नाही. रुग्णांना त्यांच्या स्थितीच्या आधारावर आयसीयू देखभालीसाठी प्राथमिकता देण्याचा विचार आपत्तीच्या काळासाठी चांगला ठरू शकतो. परंतु साधारणपणे सरकारने सर्वांना महत्त्वपूर्ण देखभाल प्रदान करण्यासाठी पुरेशा सुविधा सुनिश्चित करण्याच्या दिशेने काम करावे असे उद्गार सार्वजनिक आरोग्य कार्यकर्ते अशोक अग्रवाल यांनी काढले आहेत.