सीडीएस अनिल चौहान यांची मराठा रेजिमेंटला भेट
अग्निवीरांशी संवाद साधून केले अभिनंदन
बेळगाव : अग्निवीर हे केवळ सैनिक नाहीत तर त्यांच्यामध्ये नेतृत्वाची, संशोधनाची आणि देशरक्षणाची क्षमता आहे. म्हणूनच लष्करी सेवा ही अत्यंत उत्तम सेवा आहे. यासाठीच सर्व अग्निवीरांचे आपण अभिनंदन करतो, असे विचार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान (पीव्हीएसएम, युवायएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम) यांनी व्यक्त केले. येथील मराठा रेजिमेंटल सेंटरला सोमवारी त्यांनी भेट दिली. त्यावेळी अग्निवीरांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर वॉरफेअर यामुळे आता आपल्यासमोर वेगवेगळी आव्हाने उभी आहेत. तंत्रज्ञानाने या क्षेत्रातही बराच विकास केला आहे. परंतु, तंत्रज्ञानाचे आव्हानही उभे ठाकले आहे. त्यामुळे तंत्रज्ञान हे सतत शिकत राहायला हवे. अग्निवीरांनी लष्करी पेशा स्वीकारला, ही अत्यंत स्वागतार्ह बाब असून सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सतत वेगवेगळ्या आव्हानांचा, कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. पण तो सामना आनंदाने करत सैनिक देशाचे रक्षण करतात. त्याचप्रमाणे अग्निवीरसुद्धा हे आव्हान स्वीकारतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेजिमेंटल सेंटरमध्ये दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाबद्दल त्यांनी प्रशंसा व्यक्त केली. तसेच सैनिकांना घडविण्यामध्ये व्यावसायिक प्रशिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले.