भविष्य टांगणीला...उमेदवार घायकुतीला
कर्ज काढून नोकरीचा प्रयत्न : सीबीआयच्या कारवाईमुळे भविष्य अंधकारमय
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डमधील भरती प्रकरणाच्या गैरव्यवहाराबाबत पाच अधिकाऱ्यांसह 14 उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारी नोकरी मिळेल, या आशेने बँका, तसेच सोसायट्यांमधून कर्ज काढून अनेक उमेदवारांनी पैशांची तजवीज केली. परंतु, सीबीआयने या प्रकरणाचा छडा लावल्याने आता नोकरी जाण्याची शक्यता तर आहेच, शिवाय कर्जाचा बोजा डोक्यावर पडणार आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंटमध्ये 29 जागांसाठी भरती करून घेण्यात आली. यापैकी 14 उमेदवारांनी नोकरी मिळविण्यासाठी 15 ते 25 लाख रुपये अधिकाऱ्यांकडे दिले. कुली, शिपाई, वॉचमन, सॅनिटरी इन्स्पेक्टर यासह इतर पदांसाठी टप्प्याटप्प्याने भरती झाली. कॅन्टोन्मेंट बोर्ड हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्याने चांगल्या पगाराच्या अपेक्षेने काही उमेदवारांनी लाखो रुपये भरण्यासाठी होकार दिला. बरेच उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने बँका,तसेच सहकारी सोसायट्यांमधून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी ही रक्कम अधिकाऱ्यांच्या हाती सोपवली होती. भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून नोव्हेंबर 2023 पासून सुरू होती. प्रत्येक उमेदवाराला विश्वासात घेऊन सीबीआयने चौकशी केली. चौकशीअंती भरती प्रक्रियेतील गौडबंगाल अखेर बाहेर पडले आणि पाच अधिकाऱ्यांसह पैसे दिलेल्या 14 उमेदवारांवर सीबीआयने गुन्हे दाखल केले.
आता कर्ज कसे फेडायचे?
सीबीआयच्या कारवाईमुळे नोकरीवर तर गदा आलीच आहे, पण आता लाखो रुपयांचे कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न उमेदवारांसमोर आहे. ज्यांनी भरती प्रक्रियेमध्ये पैसे लाटले ते अधिकारी निवांत असले तरी पैसे दिलेले सर्वसामान्य उमेदवार मात्र अडचणीत आले आहेत.
कार्यालयात निरव शांतता
भ्रष्टाचार प्रकरणाची उकल झाल्यानंतर शुक्रवारी रात्री सीबीआयने बेंगळूर येथे गुन्हा दाखल केला. चौथा शनिवार असल्याने कार्यालयाला सुटी होती. सोमवारी कॅन्टोन्मेंट कार्यालय सुरू झाले. परंतु, निरव शांतता कार्यालयात दिसून आली. गुन्हा दाखल झालेले अधिकारी व कर्मचारीही कामावर उपस्थित होते.