कॅन्टोन्मेंटचा कारभार बनला निरंकुश
सीईओ पद रिकामेच : विकासकामांना खीळ, जनतेच्या समस्या बनल्या गंभीर
बेळगाव : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमधील सीईओपद रिक्त असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणाचाच अंकुश नाही. त्यामुळे बोर्डमधील अनेक समस्या डोकेवर काढत असून रहिवासीही वैतागले आहेत. कचऱ्याची योग्य उचल, पाणीपुरवठा, गटारींची स्वच्छता, दुरुस्तीची कामे रखडली जात असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डला कोणी वाली आहे की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे.मागील दोन वर्षांत राजीव कुमार वगळता कॅन्टोन्मेंटला कायमस्वरुपी सीईओ मिळालेले नाहीत. के.आनंद यांच्या आत्महत्येनंतर अनेक अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या. परंतु, त्या काही दिवसांसाठीच होत्या.
राजीव कुमार यांनी वर्षभराचा कालावधी बेळगावमध्ये घालवला आणि अनेक विकासकामांना गती मिळाली. त्यानंतर आलेल्या विशाल सारस्वत यांनीही चांगल्या पद्धतीने महसूल वाढीसाठी प्रयत्न केला. परंतु, त्यांना उत्तरप्रदेश सचिवालयामध्ये पद मिळाल्यामुळे त्यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला. मागील महिनाभरापासून बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओपद रिक्त आहे.सध्या मुंबई येथील डीईओ कार्यालयाचे हर्षा यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे. परंतु, कायमस्वरुपी अधिकारी नसल्यामुळे कॅन्टोन्मेंटचे अधिकारी व कर्मचारी सुस्तावले आहेत. कार्यालयीन वेळेत बाहेर फिरणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे खुर्च्या रिकामीच दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे रखडली जात आहेत.
सीईओअभावी रस्त्याची कामे रखडली
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डची मिटींग होऊ शकली नसल्याने अनेक कामांना खीळ बसली आहे. बोर्डमधील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाल्याने ते नव्याने करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. परंतु, त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सीईओ नसल्यामुळे निविदा प्रक्रिया रखडल्या जात असल्याने कॅन्टोन्मेंटला कायमस्वरुपी सीईओ देण्याची मागणी केली जात आहे.