काब्राल यांना विश्वासात घेऊनच मंत्रिपदावरून हटविले : तवडकर
आणखी कोणाला काढण्याचा विचार नाही तवडकर : राज्य सरकारचे कामकाज योग्यप्रकारे सुरळीत
मडगाव : नीलेश काब्राल यांच्याबाबतचा घेतलेला निर्णय पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना विश्वासात घेऊन घेतलेला आहे. त्यातून कोणीही अस्वस्थ होण्याची गरज नाही. राज्य सरकारचे कामकाज योग्यप्रकारे सुरळीत सुरू आहे. सरकारमधील कोणत्याही आमदारांत नाराजी नाही. आणखी कुठल्या मंत्र्यांना काढण्याचा कसलाच विचार नाही, असे सभापती रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले आहे. मडगाव येथे कार्यक्रमानिमित्ताने आलेल्या सभापती रमेश तवडकर यांनी राज्यातील आमदारांत नाराजी नसल्याचे म्हटलेले आहे. आमदार अपात्रता याचिकेवर सुनावणी सुरू असताना आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद देण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी विरोध दर्शवत त्याबाबत सभापतींना पत्र दिलेले आहे. त्यावरही सभापती तवडकर यांनी भाष्य केले. विरोधक लोकशाहीत आपापली बाजू मांडू शकतात. त्याची मुभा लोकशाहीत असल्याने अमित पाटकर यांनी मागणी केलेली आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा हे आपण घेऊ, असे सभापती तवडकर यांनी सांगितले.
राज्यातील फेरबदलामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता पसरलेली दिसते. अजूनही काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून लवकरच डच्चू मिळू शकतो, अशीही चर्चा आहे. याबाबत विचारणा केली असता सभापती तवडकर यांनी चर्चेत तथ्य नसल्याचे सांगितले. राज्य सरकारातील कोणताही आमदार नाराज आहे, असे आपणास दिसत नाही. मंत्रिमंडळातील करण्यात आलेला बदल हा नीलेश काब्राल यांना विश्वासात घेऊनच केलेला आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांना पूर्ण कल्पना देत त्यांना विश्वासात घेत हा निर्णय घेतला. काँग्रेसमधून आलेल्या आमदारांना काहीतरी पद देणे गरजेचे होते. मात्र, मंत्रिमंडळ पूर्णपणे भरलेले होते. अशावेळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून एखादा निर्णय घेण्यात आल्यास तो मानण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांकडेही याबाबत चर्चा झालेली आहे, कुणीही अस्वस्थ होण्याची गरज नाही, असे तवडकर म्हणाले.
हिवाळी अधिवेशन एका आठवड्याचे : सभापती
विधानसभा अधिवेशनाचे सत्र हे महिनाभर आधी ठरवण्यात येते. कामकाजाबाबतचे विषय आठ दिवस आधी चर्चेस घेतले जातात. त्याबाबत अजूनही बैठक झालेली नाही. यावेळी साधारणत: एक आठवड्याभराचे अधिवेशन असेल, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली.